पुणे- शाळांमध्ये सरस्वतीचे पूजन कशासाठी? पूजा जर करायचीच असेल तर ज्यांनी राज्यक्रांती घडवली त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे करा, ज्यांनी सामाजिक क्रांती घडवली त्या महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि छत्रपती शाहू महाराज, तसेच ज्यांनी तुम्हाला कायदा दिला त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे करा, असे भुजबळ यांनी म्हटले आहे.पुण्यात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या १३२ व्या पुण्यतिथीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी महात्मा फुले समता पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या कार्यक्रमात भुजबळ बोलत होते.भुजबळ पुढे म्हणाले, ‘ज्यांनी १५० वर्षांपूर्वी महिलांच्या शिक्षणाचा पुरस्कार केला त्यांची पूजा करा. कर्मवीर भाऊराव पाटील यांची पूजा करा. आज लाखो लोक शिकून मोठे होत आहेत. अण्णासाहेब कर्वे यांची पूजा करा. देवी सरस्वती कुठून आली? सरस्वती देवीने किती शाळा काढल्या? सरस्वती देवीने किती लोकांना शिकवले? सरस्वतींनी जर शिक्षण दिले असे आपण मानतो तर मग महात्मा फुल्यांना हे पाऊल का उचलावे लागले?, फुल्यांच्या अगोदर शिक्षण सर्व समाजाला का मिळाले नाही? ब्राह्मण समाजातील महिलांनाही का मग शिक्षण मिळत नव्हते?, असे एकावर एक सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केले.
सरस्वतीचा, शारदा मातेचा फोटो लावला जातो. त्यांना आम्ही काही पाहिले नाही. त्यांनी आम्हाला काही शिकवले नाही. त्यांनी ‘तीन टक्के’ लोकांना शिकवले. आम्हाला शिक्षणापासून दूर ठेवले त्यांची पूजा कशासाठी करायची,’ असा प्रश्न भुजबळ यांनी काही दिवसांपूर्वीच मुंबईत ‘अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदे’तर्फे सत्यशोधक चळवळीत काम करणाऱ्या मान्यवरांचा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमप्रसंगी उपस्थित केला होता .
भुजबळांच्या या पवित्र्यावर या पूर्वीच फडणवीसांनी भुजबळांना उत्तर दिलेले होते
शाळांमधील सरस्वती देवीचे छायाचित्र कोणत्याही परिस्थितीत हे सरकार हटविणार नाही. महापुरूषांचे फोटो लावा ही मागणी करताना सरस्वतीचे छायाचित्र हटविण्याची मागणी करण्याचे कारण काय, असा सवाल करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छायाचित्र काढण्याची मागणी फेटाळून लावली. सरस्वती ही विद्येची,कलेची देवता आहे. आमच्या संस्कृतीत सरस्वतीचा मान आहे. ज्याला भारतीय संस्कृती,परंपरा मान्य नाहीत, हिंदुत्व मान्य नाही अशीच व्यक्ती असे बोलू शकते. महापुरुषांचे फोटो तर लावलेच पाहिजेत. प्रत्येक शाळेत तर ते लावले जातातच. मात्र आमचे सरकार कोणत्याही परिस्थितीत सरस्वती देवीचे फोटो हटविणार नाही, असे फडणवीस यांनी ठणकावून सांगितले होते .