पुणे- न्यायालयात सुनावणी ,प्रकरण ज्यांच्याबाबत सुरु आहे त्या सीएम एकनाथ शिंदे यांच्यासमवेत सरन्यायाधीश एकाच मंचावर पाहायला मिळाले तर याचा संदेश समाजात काय जाईल ? याची ही काळजी घेऊ नये ? अशा स्वरूपाचे प्रश्न आता समाज माध्यमातून विचारले जाऊ लागले आहे अशी टीका राष्ट्रवादी कडून करण्यात येते आहे.एकूणच हे प्रकरण गंभीर असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर सुनावणी सुरू असताना मुख्यमंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांसोबत एका व्यासपीठावर बसणे हे संकेतांना धरून नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली.सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सरकारच्या वैधतेची गंभीर सुनावणी सुरू आहे, असे असताना मुख्यमंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांसोबत एका व्यासपीठावर बसणे याबाबतचा आक्षेप जयंत पाटील यांनी ट्विटमध्ये व्यक्त केला आहे.
सरन्यायाधीश उदय लळीत यांचा सत्कार समारंभ नुकतच पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. यावर आता प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही आपले मत मांडले. ते म्हणाले की, “सरन्यायाधीश यांना व्यासपीठावर बसवणे चुकीचे आहे. मी त्याबाबत माझे मत मांडले. घटनापीठाकडे खटला सुरू असताना सरन्यायाधीशांना कार्यक्रमात नेणे हे चुकीचे आहे.” अशी प्रतिक्रिया पाटलांनी दिली. याबाबत राज्यपालांना भेटणार का असा प्रश्न विचारला असता याबाबत टाइमपास करायला आमच्याकडे वेळ नाही, अशी खोचक प्रतिक्रियाही जयंत पाटलांनी यावेळी दिली.
27 सप्टेंबरला सुनावणी
दरम्यान, राज्यात मविआ सरकार कोसळले असून, शिवसेना कुणाची हे प्रकरण सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाकडे देण्यात आले आहे. आता या प्रकरणी पुढील सुनावणी 27 सप्टेंबर रोजी सुप्रीम कोर्टात होणार आहे. गेल्या सुनावणीत पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर सुनावणी पार पडली. त्यात शिंदे गटाचे वकील नीरज किशन कौल यांनी कोर्टात युक्तीवाद केला. निवडणूक आयोगाच्या सुनावणीवरील स्थगिती उठवण्यात यावी, यासह शिवसेनेने धनुष्यबाण गोठवावे आणि घटनापीठाने लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी कौल यांनी केली आहे.