पोलीस आयुक्तांनी खेचलेच पाहिजेत महापालिकेचे कान..
पुणे :बीआरटी,सायकल मार्ग यांनी त्या त्या रस्त्यांवर खाजगी वाहनांची गळचेपी करत वाहतूक कोंडी केली हे खरेच आहे आणि हे सत्य पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांना पटल्यानेच त्यांनी महापालिकेचे कान खेचले पाहिजेत अशी भूमिका आता घेतली गेली तर नवल वाटू नये.ज्या बीआरटी ने कलमाडींची /कॉंग्रेसची सत्ता उलथवून टाकली आणि बीआरटी ला विरोध करून सत्तेवर आलेल्या अजित पवारांनी प्रत्यक्षात सत्तेवर आल्यावर मात्र बीआरटी ला समर्थन दिले त्या अजित पवारांचीही सत्ता येथून गेली आणि त्यानंतर भाजपाच्या काळात देखील बीआरटी आणि सायकल मार्गाचा खेळखंडोबा सुरूच राहिला तो कशासाठी ? या प्रश्नाचे उत्तर सर्वांनाच ठाऊक आहे. खाजगी वाहनांची गळचेपी होते आहे, रस्त्यावर हक्क सर्वांचाच सारखा आहे.हे विसरून केवळ काही वेगळाच कारभार करतच या दोन्ही प्रकल्पांची सुमारे १५ वर्षे री ओढली गेली.वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आणि जलदगतीने प्रवास करता यावा यासाठी बस रॅपीड ट्रान्झिट- बीआरटी सेवा सुरू करण्यात आली असा देखावा करण्यात आला पण हा देखावा फार काल लपून राहू शकलेला नाही. पुण्याच्या वाहतूक कोंडीला जशी राज्यकर्त्यांकडून महापालिकेची वारंवार वाढविण्यात येणारी हद्द जबाबदार आहे तसाच महापालिकेतील भ्रष्ट कारभार हि जबाबदार आहे.
आता कुठे शहरातील वाहतूक कोंडीला बीआरटी मार्ग कारणीभूत असल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी या वाहतूक कोंडीचे खरे खापर महापालिकेवर फोडले आहे. वाहतूक कोंडी कमी करायची असेल तर, सर्व बीआरटी मार्ग बंद करा आणि अनावश्यक सायकल मार्ग काढून टाका, असे पत्र पोलिसांनी महापालिकेला पाठविले आहे.याच महापालिकेने आणि पदाधिकारी अधिकारी यांनी आमच्या सारख्या माध्यमांनी बीआरटी येण्यापूर्वीपासून बीआरटी आणि सायकल मार्गानाही केलेल्या विरोधाकडे डोळेझाक केलेली आहे.बीआरटी,सायकल मार्ग,व्यावसायिक दुकानांमधील अनधिकृत बांधकामे,पोटमाळे यांना वेळोवेळी आमच्या सारख्यांनी विरोध केलेलाच आहे.ज्या दुकानात,हॉटेलात ५० ग्राहकांची क्षमता होती त्यांनी पोटमाळे करून ती ८० पर्यंत वाढविली त्यामुळे दुकानांसमोर / हॉटेलांसमोर ५० ऐवजी ८० ग्राहकांची वाहने उभी राहू लागली.लक्ष्मी रस्त्यावरील दुकानदारांनी बांधलेले पोटमाळे अनधिकृत ठरवून ते पाडण्याची कार्यवाही पूर्वी होत होती पण कलमाडींनी निवडणुकीपूर्वी त्यांच्यासाठी पोटमाळे अधिकृत करून देण्याची सुविधा उपलब्ध करवून दिली.हा इतिहास आहे.
शहरात गेल्या काही दिवसांपासून बहुतांश भागात वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. त्यावरून केवळ वाहतूक पोलिसांवर टीका होत आहे.शहरामध्ये गर्दीच्या ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. गर्दीच्या ठिकाणी अवजड वाहतुकीस बंदी आहे. मात्र त्यानंतरही अवजड वाहने शहरात येत आहेत. शहराबाहेर धनकवडी येथे यासाठी कित्येक वर्षापूर्वीच ट्रक टर्मिनस उभारले गेले.पण हे ट्रक टर्मिनस आज कोणत्या स्थितीत आहे अशीच तत्कालीन शहराबाहेर अवजड वाहनांसाठी ठेवलेल्या जागांची काय अवस्था आहे याची माहिती देखील पोलिसांनी घेतली पाहिजे, शहरातील वाहनतळांची आणि पार्किंग साठी राखीव ठेवण्यात येणाऱ्या जागांची /भूखंडांची अवस्था काय आहे याचीही माहिती घेतली पाहिजे म्हणजेच महापालिकेला ताळ्यावर आणण्यासाठी पावले उचलली पाहिजेत.
बस, रिक्षा त्यांच्या थांब्या व्यतिरिक्त अन्य ठिकाणी थांबत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी ठोस उपाययोजना कराव्या लागणार आहेत. त्यानुसार अवजड वाहने शहरात प्रवेश करताना त्यांना वाहतूक पोलिसांनी अटकाव करावा आणि बस, रिक्षा यांना योग्य त्या ठिकाणी थांबे देण्याबाबतचे नियोजन करावे, अशी मागणी पत्राद्वारे महापालिका प्रशासनाकडून वाहतूक पोलिसांकडे काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. त्यासंदर्भात उत्तर म्हणूनच वाहतूक कोंडीचे योग्य खापर पोलिसांनी महापालिकेवर फोडले आहे.
शहरातील चोवीस रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. त्यातच बीआरटी मार्ग आणि सायकल मार्गांमुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे, असा दावा पोलिसांनी महापालिकेला दिलेल्या पत्रात केला आहे.नगर रस्ता, सोलापूर रस्ता आणि सातारा रस्त्यावर महापालिकेने बीआरटी मार्ग सुरू केला आहे. यातील नगर रस्ता हा राज्य मार्ग असून सोलापूर आणि सातारा रस्ता राष्ट्रीय महामार्ग आहेत. बाहेरील जिल्ह्यातून मुंबई, नगर, सोलापूर आणि सातारा येथे जाणारी वाहने शहरातून याच मार्गावरून जातात. या मार्गांवर जड वाहनांची वाहतूक मोठी आहे. या रस्त्यांवर बीआरटी मार्ग असल्याने बीआरटी मार्ग सार्वजनिक वाहतूक सेवेसाठी वापरला जात आहे. त्याचा ताण उर्वरित रस्त्यांवर येत असून लहान मोठे अपघात होण्याबरोबरच वाहतूक कोंडीलाही सामोरे जावे लागत आहे. या परिस्थितीत बीआरटी मार्ग आणि सायकल मार्ग काढल्यास वाहतूक कोंडी टाळता येणे शक्य आहे, असे पोलिसांनी महापालिकेला दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.त्यास आक्षेप घेता येणारा नाही.
शहरातील सार्वजनिक वाहतुकीचे सक्षमीकरण आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तसेच वेगवान वाहतुकीचे शाश्वत साधन उपलब्ध व्हावे, यासाठी पंधरा वर्षांपूर्वी बीआरटी योजना सुरू करण्यात आली. मात्र बीआरटी मार्ग पंधरा वर्षानंतरही त्याने वाहतूक कोंडी कमी करू शकलेला नाही हे उघड सत्य आहे. मेट्रो आणूनही पुण्याची वाहतूक कोंडी ची समस्या सुटणार नाही अगर कमी होणार नाही हे देखील वारंवार सांगितले गेलेले आहे. पण निव्वळ घाई प्रकल्प आणायची केली गेली,समस्या सोडविण्याची केली गेली नाही हे लक्षात घेतले गेले पाहिजे.अनधिकृत बांधकामे थांबलीच पाहिजेत,सायकल मार्गाची शहराला गरज नाही, बीआरटी उखडून फेकून दिलीच पाहिजे.पार्किंगच्या,ट्रक टर्मिनसच्या जागांचे रक्षण केले गेलेच पाहिजे आणि आता महापालिकेच्या हद्दी वाढविण्याला लगाम घातलाच पाहिजे.रस्ते रुंद केले गेलेच पाहिजेत.याच यावरील उपाय योजना आहेत.शहराच्या बाहेर ५० किलोमीटर पर्यंत शेती झोन ठेऊन पुढे खेडी विकसित करण्याचे धोरण ठेवले पाहिजे. एखाद्या एका दुसऱ्या शहरावरच अब्जावधींची उधळण करण्यापेक्षा शहरापासून ५० किमी अंतरापुढे असलेली खेडी विकसित करण्याचे धोरण राबविले पाहिजे.याकडे राज्यकर्त्यांनी दुर्लक्ष केल्याने शहरांचे अजगर फोफावत चाललेले आहेत हे प्रमुख कारण लक्षात घेतले जात नाही हि खंत आहे.