पुणे – रेशनवरील धान्य मिळण्याबाबत तक्रारी येत आहेत त्या निवारण करण्यासाठी भरारी पथके नेमावीत आणि राज्य शासनाने धान्याचा कोटा वाढवून द्यावा, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी अन्नधान्य वितरण आढावा बैठकीत आज (मंगळवारी) केली.
शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील अन्नधान्य वितरणाचा आढावा घेण्यासाठी आमदार शिरोळे यांनी बैठक घेतली. बैठकीला शिवाजीनगर मतदारसंघातील अन्नधान्य वितरण अधिकारी उपस्थित होते. त्यात विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. नागरिकांनी रेशन दुकानदारांकडे आधार लिंक करण्यासाठीचे फॉर्म तीन महिन्यांपूर्वीच जमा केलेले आहेत. मात्र, रेशन दुकानदारांनी क विभाग येथे ते फॉर्म जमा केलेले नाहीत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. गेल्या दोन वर्षांपासून रेशन दुकानदार शासनाकडून तीन महिन्यांतून एकदाच साखर घेतात आणि नागरिकांना एक किलो साखर देतात. बाकी दोन किलो साखर ते दुकानदार देतच नाहीत असे नागरिकांनी शिरोळे यांना सांगितले. धान्य कोटा कमी येत असल्यामुळे नागरिकांना धान्य वितरण करण्यात अडचणी निर्माण होत आहेत असे अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. तरी, धान्याचा कोटा वाढवावा. रेशन कार्ड आधारला लिंक केले तरी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाकडून लवकर मान्यता मिळत नाही ही बाब गंभीर आहे. यासाठी मंत्रालयाकडून लवकर मान्यता मिळवण्यासाठी प्रयत्न करेन अशी ग्वाही आमदार शिरोळे यांनी बैठकीत दिली.
रेशन दुकानात दक्षता समितीचे फलक लावले जावेत. तलाठ्याने, उत्पन्नाचे दाखले तातडीने द्यावेत अशा सूचना आमदार शिरोळे यांनी केल्या आणि अन्न, नागरी पुरवठा आणि महसूल खात्याच्या मंत्र्यांनी यात लक्ष घालावे असेही आमदार शिरोळे यांनी सांगितले.
पंतप्रधान गरीब कल्याण योजना २०२१ अंतर्गत मे, जून महिन्याच्या कालावधीत मोफत ५किलो धान्य वाटप होत आहे. शिवाजीनगर मतदारसंघात हे वाटप किती झाले याची माहिती मिळावी. तसेच शिवाजीनगर क विभागाच्या अंतर्गत जानेवारी २०२० ते ३१ मे २०२१ पर्यंत किती रेशनकार्ड धारकांना साखर वितरीत केली याची नावासह यादी मला द्यावी असे आमदार शिरोळे यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. या सर्व मुद्द्यांचे पत्र आमदार शिरोळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आजच पाठवले आहे.