एमआयटीतर्फे सुवर्णपदक विजेत्या सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा
पुणे, १० ऑगस्टः “ शिक्षण हे केवळ डिग्री पुरती मर्यादित न राहता त्यातून सुंदर व्यक्तिमत्वाचा विकास होतो. सर्वानी मानवतेचे जतन केले पाहिजे. भविष्यात सद्गुणांच्या जोरावरच भारत विश्वगुरू बनेल.” असे विचार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी व्यक्त केले.
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआईटी पुणेच्या वतीने आयोजित केल्या गेलेल्या “वैश्विक मूल्याधिष्ठित शिक्षण आणि यशस्वी व्यक्तिमत्व विकास परीक्षा २०२०” या राज्यस्तरीय प्रमाणपत्र परीक्षेत यशस्वी झालेल्या सुवर्णपदक विजेत्या सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्याच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती अभ्यासक्रम संशोधन मंडळ, बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील हे सन्माननीय प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी विश्वशांती केंद्र (आळंदी) व माइर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा.कराड हे होते.
यावेळी परीक्षेचे प्रमुख समन्वयक व नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस आणि प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे उपस्थित होते.
डॉ. मृणालिनी फडणवीस म्हणाल्या,“ विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच कौशल्य, व्यक्तिमत्व, विकास यावर सतत जोर दयावा. पण हा विकास शाश्वत असावा. मी, पणाचा अहंकार सोडून विश्वबंधुत्वसाठी कार्य करावे. भारतात मानवता आहे आणि याचा सदगुणाच्या जोरावर भारत विश्वगुरू बनेल. विद्यार्थ्यांनी स्वतःला ओळखून सर्वांना एकत्रीत घेऊन चालावे.”
“या परिक्षेच्या माध्यमातून केवळ विद्यार्थी घडविले जात नाही तर समाजाचे चरित्र निर्माण होत आहे. नव्या पिढीला जाणीव करण्यासाठी डॉ. कराड यांनी वैश्विक मूल्याधिष्ठित शिक्षण परिक्षा सुरू केली आहे.”
डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ विज्ञानाच्या युगात सुंदर जीवन निर्माण करण्यासाठी अध्यात्माची गरज आहे. सर्व शास्त्रांचा अभ्यास करतांना स्वतःचा धर्म कधीही विसरू नये. ईश्वर ही एक शक्ती आहे व्यक्ती नाही. सद्गुणांची पूजा हीच ईश्वरसेवा आहे. आज माऊलीच्या आशिर्वादानेच संपूर्ण विश्वात शांती निर्माण करण्यासाठी जगातील सर्वात मोठ्या घुमटाची निर्मिती झाली आहे. येणार्या काळात या घुमटाच्या माध्यमातून व वसुधैव कुटुम्बकमच्या मंत्रातूनच सर्व जगाला शांतीचा मार्ग दाखविता येईल.”
कृष्णकुमार पाटील म्हणाले,“पारंपारिक शिक्षणाबरोबरच वैश्विक मूल्याधिष्ठित शिक्षण ही काळाची गरज आहे. या मुळे भविष्यात एक आदर्श नागरिक बनाला. या परीक्षेतून सर्वगुण संपन्न नागरिक तयार होतो. पुढे हेच विद्यार्थी समाजसेवक बनून समाजात बदल घडवितात.”
डॉ. एस.एन.पठाण म्हणाले,“ विद्यार्थ्यांनमध्ये गुणवृद्धि व्हावी, त्यांनी ध्यास घेवून सतत कार्य करत रहावे. मुलांना यशस्विता कळावी व आयुष्यात त्याचा उपयोग करावा. त्यासाठी मूल्याधिष्ठित शिक्षण देणे गरजेचे आहे. संस्कारक्षम नव पिढी तयार करण्यासाठी ही परिक्षा आहे.”
या वेळी साक्षी आघाव, जान्हवी करारे, तेजस्वी प्रधान, प्रणम्य जोशी या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
प्रा.डॉ.प्रिती जोशी यांनी सूत्रसंचालन केले.