महापालिकेच्या मुख्य सभेत पुन्हा हुतुतू … सभा घ्यावी कि न घ्यावी ..यावर सामना सुरूच ..
पुणे -महापालिकेची मुख्य सभा चालवावी कि चालवू नये यावरून महापालिकेच्या सभागृहात आज झालेल्या मुख्य सभेत पुन्हा सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात हुतु तू चा सामना रंगलेला दिसला . तुमच्या उपमुख्यमंत्र्यांकडून परवानगी आणा आणि घ्या सभा … असे माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी सुनावले आणि अहो तुम्ही ऑनलाईन सभा घेण्याचे आदेश असल्याचे सांगत आहात ..सांगा ऑनलाईन असलेल्या कुठल्या सभासदाशी महापौर आणि प्रशासनाने कोणत्या मुख्य सभेत संपर्क ,संवाद साधला किंवा उत्तरे दिली ? असा प्रश्न कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सभासदांकडून करण्यात आला .श्रीनाथ भिमाले, धीरज घाटे व्हर्सेस आबा बागुल , अविनाश बागवे, दिपाली धुमाळ, योगेश ससाणे, पृथ्वीराज सुतार असे चित्र सभागृहात दिसले . पहा हा लाइव्ह व्हिडीओ
शहरात कोरोनाचे संकट गंभीर झाले आहे. रुग्णांना बेडस मिळत नाही. त्यामुळे अनेक नागरिकांचे जीव जात आहेत. तर, मागील वर्षी जोरदार पाऊस होऊन त्यामध्ये 5 नागरिकांचा मृत्यू झाला होता. या सर्व प्रश्नांवर चर्चा करण्याची मागणी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेतर्फे करण्यात आली. मात्र, राज्यात तुमचे महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे आधी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सभा चालविण्याचे आदेश आणा, अशा शब्दांत भाजपने विरोधकांना सुनावले. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षात सोमवारी पुणे महापालिकेच्या ऑनलाइन सभेत चांगलीच जुंपल्याचे चित्र दिसून आले.
सत्ताधारी दादागिरी करीत असल्याचा आरोप करत विरोधी पक्षांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर जोरदार घोषणाबाजी केली. विरोधी पक्षनेत्या दिपाली प्रदीप धुमाळ, काँग्रेसचे गटनेते आबा बागुल, शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, नगररसेवक गणेश ढोरे, गफूरभाई पठाण, यांनी घोषणाबाजी केली. मागील वर्षी झालेल्या पावसामुळे 5 नागरिकांचे बळी गेले होते. त्यावर प्रशासनाला खुलासा करू न देणे बरोबर नसल्याचे आबा बागुल यांनी सांगितले.
आज झालेल्या जोरदार पावसामुळे चेंबर्स तुंबले. वाहतूक कोंडी झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही परिस्थिती बिकट आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी आपण काय नियोजन केले, असा सवाल शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी उपस्थित केला.
या पावसामुळे महापालिकेत येत असताना प्रचंड त्रास झाला. प्रशासनाने काय नियोजन केले, याचा खुलासा करण्याची मागणी विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ यांनी केली.
धरणांत पाणी आहे, मात्र, हडपसर परिसरातील नागरिकांना पाणी मिळत नसल्याचे राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेश ससाणे यांनी सांगितले.16 सप्टेंबर आणि सोमवार पर्यंत पाणीपुरवठा वाढविणार असल्याचे आश्वासन पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी दिले होते. मात्र, ते पाळण्यात आले नाही. हडपसरची बोंबाबोंब सुरू आहे.नागरिकांना प्यायला पाणी नाही. सकाळी सहापासून पाण्यासाठी नागरिकांचे फोन सुरू आहेत. शहरात 24 तास पाणी मिळत आहे, पण आम्हाला अर्धा तासही पाणी मिळत नाही. 8 दिवस द्यायला सांगितले होते. 15 दिवस झाले पण पाणी मिळत नसल्याचे ससाणे यावेळी म्हणाले.
7 ते 8 लाख नागरिकांच्या जिव्हाळ्याचा हा प्रश्न आहे. शहरात 24 तास पाणी मिळत असताना हडपसरवर अन्याय का करता, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. धरणे 100 टक्के भरलेली असताना असमान पाणीपुरवठा होत आहे. आम्हाला चांगल्या दाबाने पाणीपुरवठा कधी होणार, त्याचा अधिकाऱ्यांना खुलासा करू द्या, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
नगरसेवक पाण्यासाठी बोलतात, मात्र तुम्ही सभा कधी तहकूब करायची यावर चर्चा करीत आहात, हे बरोबर नसल्याचे स्वीकृत नगरसेवक सुभाष जगताप म्हणाले.
पुण्यात जोरदार पाऊस सुरू आहे. पुणे महापालिकेची सभा चालविण्याचे राज्य शासनाचे आदेश नाहीत. तुम्ही बेकायदेशीर कामकाज चालवा म्हणून ठाकरे सरकारचा अवमान करीत असल्याचे सभागृह नेते धीरज घाटे यांनी विरोधकांना सुनावले.
त्यावर तुम्हाला नियम पाळून सभा घ्यायला सांगितले आहे, तुम्हाला एवढा पुळका का? असा सवाल पृथ्वीराज सुतार यांनी उपस्थित केला. सभा तहकूब करून महापौर दालनात चर्चा करू, असे धीरज घाटे म्हणाले.
त्यावर खुलासा करताना पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ड्रेनेज आणि रस्ते विभागाने विविध उपाययोजना केल्या आहेत. असे अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सांगितले.आणि 1 ते २वाक्यात सभासदांची बोळवण करण्यात येत असल्याचे लक्षात येताच त्यावर हरकत घेत अशा प्रकारचा मोघम खुलासा करणे बरोबर नाही. कोणत्या विभागाला काय आदेश दिले, याचा खुलासा करावा, असेही त्यांनी म्हटले.