पुणे- वाहतूक कोंडी ,वर्दळ, अरुंद रस्ते ,खराब रस्ते ,अपघात यांचे प्रश्न शहरात आणि शहरांबाहेर देखील ऐरणीवर येत असताना आता खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे -सोलापूर महामार्गाकडे लक्ष द्या असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना केले आहे.
सुळे यांनी म्हटले आहे कि, पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत मोठ्या प्रमाणावर नागरीकीकरण झाले आहे. महामार्गालगत लोणी काळभोर,उरुळी कांचन,यवत,वरवंड,पाटस,भिगवण अशी अनेक मोठी गावे आहेत.या गावांच्या मध्यातून हा महामार्ग जात असूनही अनेक ठिकाणी नागरीकांसाठी सुरक्षेच्या पुरेशा उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत.अनेक ठिकाणी रस्ते दुभाजकांची दुरवस्था झालेली असून, विजेची देखील सोय नाही. यामुळे येथे वारंवार अपघात घडतात. या भागात होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी तसेच नागरीकांची सोय लक्षात घेता येथे सुरक्षाविषयक उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.तरी माझी रस्ते व महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी यांना विनंती आहे की कृपया या बाबतीत संबंधित विभागास सूचना देण्याबाबत सकारात्मक विचार करावा.