पुणे – अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च पर्वती, पुणे महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळ व जिल्हाअधिकारी कार्यालय (निवडणूक शाखा) पुणे यांचे संयुक्त विद्यमाने नवमतदार नोंदणी महाअभियान राबविण्यात आले. या अभियानाची सुरवात अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे खजिनदार विजयसिंह जेधे , उपजिल्हाधिकारी सुरेखा माने व नायब तहसीलदार अविनाश कांबळे,प्राचार्य डॉ.सुनील ठाकरे यांचे उपस्थितीत झाली. या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मतदार यादीत नाव येण्यासाठी काय करावे लागेल ,कोणता फॉर्म भरावा, अर्ज ऑनलाइन करायचा की ऑफलाइन, मतदार यादीत नावासाठी कोणती कागदपत्रे लागतील, अर्ज कुठे करावा, नाव नोंदणी अर्ज सादर करणे ते ओळखपत्र मिळवणे यादरम्यान ची सर्व प्रक्रिया व त्यासाठी किती वेळ लागतो ह्या तरुणाईला पडलेल्या अशा असंख्य प्रश्नाचे उत्तरे यावेळी माने यांनी दिली. समृद्ध सुजाण उबळकट आणि पारदर्शक लोकशाही प्रक्रियेसाठी तरुणांनी मतदार यादीत नाव नोंदणी करून मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन या प्रसंगी सौ.सुरेखा माने यांनी केले श्री. अविनाश कांबळे यांनी भारताची लोकशाही व्यवस्था ही जगातील मोठी लोकशाही आहे. लोकशाही टिकवण्यासाठी अधिक सुदृढ करण्याची जबाबदारी आजच्या तरुण पिढीवर आहे. पारदर्शक निवडणुका हा लोकशाहीचा गाभा आहे. त्यासाठी मतदार याद्या निर्दोष, पारदर्शक, परिपूर्ण व अधिक अचूक असावी. कोणी ही मतदानापासून वंचित राहू नये आजच्या तरुण वर्गाच्या हातात लोकशाहीच्या नाड्या आहेत तेच जर या प्रक्रियेच्या बाहेर असतील तर लोकशाही कशी बळकट होणार म्हणून तरुणांनी वंचित, समाजातील घटकांना प्रवाहात आणण्यासाठी प्रवृत्त करावे. जास्तीत जास्त युवा वर्गाला मतदार यादीत नाव नोंदणी करता यावी यासाठी वर्षातून चार वेळा आगाऊ नोंदणी करण्याची सुविधा देण्यात आली आहे या सुविधेचा लाभ घेऊन 18 वर्षे पूर्ण न झालेल्या तरुणांनाही नाव नोंदविता येणार आहे मात्र त्याचे नाव वाचा समावेश 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मतदार यादीत होणार असे मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमासाठी सौ.सुरेखा माने, अविनाश कांबळे, विजयसिंह जेधे, डॉ.सुनील ठाकरे,सौ.चंद्रकला शेळके, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन प्राचार्य डॉ. सुनिल ठाकरे यांचे मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा.वैशाली भिमटे,विद्यार्थी विकास मंडळ अधिकारी प्रा.सुप्रिया शिंदे , महाविद्यालय मतदार नोंदणी प्रतिनिधी श्री.सचिन भोरडे यांनी केले. महाविद्यालयाने हा उपक्रम राबविल्याबद्दल संस्थेच्या सरचिटणीस मा.सौ.प्रमिला गायकवाड यांनी सर्वांचे अभिनंदन केले.