पुणे- मराठी रंगभूमी, चित्रपटसृष्टी आणि हिंदी सिनेविश्वात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनय कौशल्याने स्वत:ची स्वतंत्र ओळख प्रस्थापित करणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे रविवारी पुण्यात निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. गेल्या १७ दिवसांपासून विक्रम गोखले यांच्यावर पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. यादरम्यान त्यांच्या प्रकृतीत अनेक चढ-उतार पाहायला मिळाले. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. मात्र, आज दुपारी १ वाजून ४५ मिनिटांनी विक्रम गोखले यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी वृषाली आणि कन्या असा परिवार आहे.आज संध्याकाळी वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. ४ वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यांनी ‘तुझेच मी गीत गात आहे’ या स्टार प्रवाहवरील मालिकेत अखेरचे काम केले. तर नुकताच प्रदर्शित झालेला ‘गोदावरी’ हा त्यांचा अखेरचा सिनेमा ठरला.
विक्रम गोखले यांचा अल्पपरिचय.
जन्म. ३० ऑक्टोबर १९४५
सध्या नव्या नाटकाच्या तालमीलाही सगळे नट एकाच वेळी उपलब्ध असत नाहीत. त्यामुळे दिग्दर्शक प्रत्येकाला त्याच्या सवडीनुसार स्वतंत्र तालीम देऊन नाटक (कसेबसे) उभे करतो. अशा जमान्यात नाटकाचा सखोल आणि सर्वागीण विचार संभवणे अवघडच; परंतु काही मोजके नट याला अपवाद आहेत. त्यापैकी एक होते विक्रम गोखले!
विक्रम गोखले यांनी रंगभूमी, टेलिव्हिजन आणि सिनेमा हे सर्वच व्यासपीठ गाजवले होते. तसेच रंगभूमीवर पण त्यांनी एक मोठा काळ गाजवला.पणजी दुर्गाबाई कामत, आजी कमलाबाई गोखले आणि वडील चंद्रकांत गोखले असा तीन पिढय़ांपासून अभिनयाचा वारसा लाभलेल्या विक्रम गोखले यांनी बालकलाकार म्हणून पदार्पण केले.
विजया मेहता यांच्या तालमीत तयार झालेल्या शिष्यांमध्ये विक्रम गोखले हे एक बिनीचे शिलेदार होते. नाटकाचा सर्वस्पर्शी विचार कसा करावा, याचे बाळकडू त्यांना विजया बाईंकडून मिळाले. ‘बॅरिस्टर’ ही त्याची उत्तम फलश्रुती.
विक्रम गोखले यांच्या पणजी दुर्गाबाई कामत या भारतीय चित्रपट सृष्टीतल्या पहिल्या स्त्री अभिनेत्या, तर आजी कमलाबाई गोखले (तेव्हाच्या कमलाबाई कामत) या पहिल्या बाल-अभिनेत्री होत्या. १९१३ साली दुर्गाबाईंनी दादासाहेब फाळके यांची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेल्या ‘मोहिनी भस्मासुर’ नावाच्या चित्रपटात पार्वतीची आणि कमलाबाईंनी मोहिनीची भूमिका केली होती. विक्रम गोखले यांचे वडील चंद्रकांत गोखले यांनी ७० हून अधिक हिंदी-मराठी चित्रपटांतून भूमिका केल्या होत्या. विक्रम गोखले यांनी घराणेशाहीच्या जोरावर अभिनय क्षेत्रात हडेलहप्पी करण्याचा मार्ग न पत्करता अभ्यासपूर्वक त्यातले सूक्ष्म कंगोरे आत्मसात केले. जाणीवपूर्वक भूमिका निवडून त्यांना आपल्या निरीक्षणशक्तीची, आकलन आणि विश्लेषणाची जोड देऊन त्यांवर आपला असा ठसा उमटवला. मग ती भूमिका ‘माहेरची साडी’सारख्या सिनेमातली का असेना. रंगभूमी, चित्रपट, चित्रवाणी या प्रत्येक माध्यमाची निकड त्यांनी सहजगत्या आत्मसात केली. त्यांच्या या चोखंदळपणामुळेच ते कला क्षेत्रातले संगीत नाटक अकादमी पुरस्कारासह अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांचे धनी होऊ शकले. ते कलेचा साकल्याने विचार करणारे, नव्या पिढीला प्रशिक्षण देणारे, त्या संदर्भात बांधीलकी जपणारे एक कर्ते रंगधर्मी आहेत. म्हणूनच रंगभूमीवर सध्या सुरू असलेल्या त्यांच्या ‘के दिल अभी भरा नहीं’ या नाटकाचे प्रयोग डोळ्याला इजा झालेली असतानाही त्यांनी थांबवले नाहीत.
अभिनयासोबतच विक्रम गोखलेंनी लेखन आणि दिग्दर्शन क्षेत्रातही काम केलं आहे. २०१० मध्ये त्यांनी आघात या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपटाचं समिक्षकांनी विशेष कौतुक केलं होतं. २०१३ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या #अनुमती या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं.
गेल्या काही काळापासून घशाच्या त्रासामुळे त्यांनी नाटकातून संन्यास घेतला आहे. सध्या ते नवोदित कलावंतांना अभिनयाचं प्रशिक्षण देण्याचंही काम करत असत. विक्रम गोखले यांची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला ‘गोदावरी’ हा चित्रपट याच महिन्यात प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्यांनी जितेंद्र जोश, नीना कुळकर्णी, संजय मोने, गौरी नलावडे यांच्यासोबत काम केलं.
सध्या विक्रम गोखले ‘तुझेच मी गीत गात आहे’ या स्टार प्रवाहवरील मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. मालिकांविषयी बोलायचे झाल्यास काही वर्षांपूर्वी आलेली त्यांची स्टार प्रवाहची मालिका ‘अग्निहोत्र’ विशेष गाजली होती. या मालिकेत विक्रम यांनी साकारलेले मोरेश्वर अग्निहोत्री हे पात्र आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.
हम दिल दे चुके सनम, भूलभुलैया, मिशन मंगल, अग्निपथ, दिलसे यासारख्या अनेक मोठ्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये विक्रम गोखले यांनी काम केले होते.
दुसरीकडे सामाजिक बांधीलकीचा वसाही त्यांनी जपलेला होता. कमलाबाई गोखले पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टतर्फे अपंग सैनिक आणि समाजातील उपेक्षितांसाठी गेली कित्येक वर्षे ते सक्रिय कार्य करतात.
कलावंतांना उतारवयात हक्काचे ठिकाण असावे, या उद्देशाने ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले आणि त्यांचे भाचे यांनी काही काळा पुर्वीदोन एकर जमीन अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला दान केली होती. मुळशी तालुक्यात नाणे गाव येथील या जागेत वृद्धाश्रम आणि कलाकारांना सादरीकरणासाठी खुला रंगमंच साकारण्यात येणार आहे.
विक्रम गोखले यांना आधुनिक मराठी रंगभूमीचे प्रणेते विष्णुदास भावे यांच्या नावे दिल्या जाणारा पुरस्कार मिळाला होता. वडिल चंद्रकांत गोखले यांनाही भावे पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
२०१६ मध्ये राजा परांजपे प्रतिष्ठानतर्फे विक्रम गोखले यांना ‘राजा परांजपे जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला होता.