पुणे-राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्र आणि मराठी माणसाबद्दल वादग्रस्त विधान करून संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांचा अवमान केला आहे. याच्या निषेधार्थ शहर शिवसेनेतर्फे गुडलक चौकात आंदोलन करण्यात आले. वादग्रस्त विधान करून राज्यात जातिय तेढ निर्माण केल्याने राज्यपालांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
मुंबईतून राजस्थानी, गुजराती लोक गेल्यानंतर मुंबईत पैसा उरणार नाही. मुंबई देशाची आर्थिक राजधानी राहणार नाही, असे वादग्रस्त विधान राज्यपाल कोश्यारी यांनी केले होते. गुडलक चौक परिसरात शिवसेनेने आंदोलन करून राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध केला. यावेळी शिवसेनेचे पुणे शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, शहर उपप्रमुख प्रशांत राणे, बाळासाहेब मालुसरे, भरत कुंभारकर, सविता मते, कल्पना थोरवे,उमेश वाघ, निकीता मारटकर, छाया भोसले, अमृत पठारे, स्वाती कथलकर, वैशाली आंब्रे, जयश्री भणगे, सीमा वरखडे, श्रृती नाझिरकर, सुलभा तळेकर, अनुपमा मांगडे, गायत्री गरूड, विश्वास चव्हाण, प्रविण डोंगरे, राजेश मोरे, उत्तम भुजबळ, अनिल दामजी, राम थरकुडे, नितीन शिंदे, सागर माळकर, अनंत घरत, राजाभाऊ होले, सनी गवते, युवराज पारीख, जान महंमद, धनंजय देशमुख, किशोर रजपुत आणि शिवसेना, युवासेना, महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
मोरे म्हणाले, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे राज्याचे नाही तर भाजपचे ‘भाज्यपाल’ आहेत. वारंवार वादग्रस्त विधान करून ते राज्याचा अपमान करत आहेत. मराठी माणसाचा अवमान करून गुजराती, मारवाडी मते भाजपकडे वळवण्याचा खटाटोप ते करत आहेत. मात्र, मराठी माणूस आणि महाराष्ट्राबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे मुंबईत गुण्यागोविंदाने राहणाNया दोन समाजांमध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचे काम राज्यपालांनी केले आहे. निवृत्ती घेऊन त्यांनी भाजपचा खुशाल प्रचार करावा. मात्र, राज्यपाल या सर्वोच्च पदावर राहून भाजपचा प्रचार करणे अयोग्य असून त्याचा आम्ही निषेध करतो.
यावेळी राज्यपाल ‘गो बॅक’, काळी टोपी पाताळ धुंडी, जातीवाद-प्रांतवाद निर्माण करणाऱ्या राज्यपालांचा निषेध असो अशा घोषणा देण्यात आल्या.