पुणे (प्रतिनिधी) : बीव्हीजीच्या सेंद्रिय कृषी निविष्ठांचे पारगाव तर्फे आळे (ता.जुन्नर) फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या वतीने नुकतेच अनावरण करण्यात आले. यावेळी बीव्हीजीचे चेअरमन हणमंतराव गायकवाड, फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष प्रशांत टट्टू , रामदास चव्हाण, बीव्हीजी ॲग्रोटेकचे अरुण बारगजे, अनिकेत येवले, दिलीप डुंबरे , बापू लोखंडे सचिन काफरे व राज्याच्या विविध भागातील शेतकरी उपस्थित होते.
यावेळी गायकवाड यांनी सेंद्रिय शेतीचे महत्व उपस्थित शेतकऱ्यांना समजावून सांगितले. ते म्हणाले, ” जगभरात विविध प्रकारच्या विषाणू संक्रमणाचा काळ सध्या सुरु आहे. विषाणूजन्य रोगांचा मुकाबला करण्यासाठी मानवी आरोग्य मजबूत असणे गरजेचे आहे. मानवी आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी सकस आहाराची गरज आहे. मानव जातीला सकस आहार देण्यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीचा अवलंब करणे काळाची गरज आहे. देशभरात सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी बीव्हीजीने पुढाकार घेतला आहे. त्याचा पहिला टप्पा म्हणून सेंद्रिय कृषी निविष्ठा कंपनीच्या वतीने शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.”
टट्टू म्हणाले, ” रासायनिक औषधांच्या वारेमाप वापराने शेतीची उत्पादकता कमी झाली आहे. त्याचबरोबर उत्पादीत होणारा शेतमाल मानवी आरोग्यास धोकादायक आहे. या पुढच्या काळात मानवी आयुर्मान वाढवण्यासाठी सेंद्रिय शेतीचाच अवलंब करावा लागणार आहे. बीव्हीजीने राज्यात सेंद्रिय शेतीची चळवळ उभी केली आहे. त्यांच्या चळवळीत राज्यातील शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवणे ही काळाची गरज आहे.