राष्ट्रवादी च्या नितीन कदमांचा सवाल
२५ सप्टेबरला म्हणजे उदया आंबील ओढा दुर्घटनेला एक वर्ष
पुणे:राष्ट्रवादी कॉंग्रेस,पर्वती मतदारसंघाचे अध्यक्ष नितीन कदम म्हणाले ,’पुणेकर २५ सप्टेबर २०१९ चा काळाकुट दिवस विसरलेले नाही. याच दिवशी अतीवृष्टीमुळे कात्रज, धनकवडी, बिबवेवाडी, सहकारनगरमधील नागरीकांचे प्रचंड नुकसान केले. सुमारे दहा लोकांना आपले प्राण गमवावे लागले. शेकडो लोकांचे संसार उध्वस्त झाले. अनेक लोक रस्त्यावर आले. त्यातून अजूनही लोक सावरलेले नाहीत.येत्या २५ सप्टेबरला म्हणजे उदया आंबील ओढा दुर्घटनेला एक वर्ष होत आहे. गेल्या वर्षभरात सत्ताधारी भाजपने दिलेल्या आश्वासने पुराच्या पाण्यासारखी वाहून गेली आहेत. त्यातच आता मलनिस्सारण खात्याकडून माहिती घेता असे समजते की गेल्या ४५ दिवसांपूर्वी आंबील ओढा सिंमा भिंत बांधण्याचा ठराव स्थायी समितीने मान्य केला परंतु त्यावर अध्यक्षांची सही न झाल्यामुळे तो खात्यास प्राप्त झालेला नाही. त्याची वर्क ऑर्डर अजूनही ठेकेदाराला देण्यात आलेली नाही. त्यामुळे काम सुरु झालेले नाही. काय हे पुणेकरांचे दुर्दैव,वास्तविक ठराव मान्य झाल्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष सही करतात आणि तो संबंधीत खात्याकडे पाठवण्यात येतो. त्यानंतर ठेकेदाराला कामाची वर्क ऑर्डर देण्यात येते. परंतु तब्बल दिड महिन्यांनंतरही ठराव स्थायी समितीमध्ये सही साठी पडून आहे. यामागे काय गौडबंगाल आहे हे कळत नाही,
स्थायी समिती अजूनही दुसऱ्या दुर्घटनेची वाट पहात आहे असे दिसते आहे. दुसरीकडे मात्र भाबडे स्थानिक नागरिक सिंमा भिंत बांधून आपल्याला पुन्हा त्या परिस्थितीला सामोरे जावे लागणार नाही अशी आशा बाळगत आहेत. त्यात जनतेचा काहीच दोष नाही. कारण त्यांनीच भाजपला सत्ता दिली आहे आणि आपली सुरक्षितता त्यांच्या दावणीला बांधली आहे. त्याची परतफेड भाजप महिना-महिनाभर जनतेच्या सुरक्षिततेच्या ठरावावर आणि जनतेच्या पैशांवर नागोबासारखे ठाण मांडून करीत आहे. असेही नितीन कदम यांनी ‘माय मराठी’कडे भावना व्यक्त करताना म्हटले आहे.