कोरोना , लॉक डाऊन च्या काळात अनेकांच्या नौकऱ्या गेल्या, अनेकांच्या व्यवसायाचे बारा वाजले ,काहीचे व्यवसायच बंद पडले तर काहींचे रखडत रखडत सुरु झालेत .रोजगार गेल्यानंतर आता पुन्हा उद्योग व्यवसाय सुरु झाले असले तरी म्हणावे एवढे तेज किंवा कोरोना पूर्वीच्या गती अद्यापही मानवी जीवनाला मिळू शकलेली नाही . वर्षभराच्या या काळाने पुण्याला आणि येथे आलेल्या प्रत्येकाला खूप काही शिकविले .
या सर्व गोष्टींचा परिणाम पुढच्या वर्षी होणाऱ्या महापालिका निवडणुकीत निश्चितच सर्वच पक्षांवरही परिणाम करणार आहे. अगदी केंद्राच्या बजेट ने आणि महापालिकेच्या बजेट ने सामान्य काय, मध्यमवर्गीय काय आणि उच्च मध्यमवर्गीय काय ? सर्वांच्याच तोंडाला पाने पुसली आहेत . नागरिक भाजपच नाही तर भाजपला टक्कर देऊ पाहणाऱ्या राष्ट्रवादी वर देखील खूप खुश आहे असे चित्र अजिबात नाही . मनसे आणि भाजपची युती होण्याच्या गप्पा ऐकायला येतात . पण असे झाले तर मनसे चे आहे तेच २ नगरसेवक टिकतील हेही खरे आहे. मनसेला अशा अभद्र युतीचा फायदा होईल असे काही मानायला कोणी तयार होत नाही . अशा स्थितीत कॉंग्रेस हि एक खंबी नेतृत्व नसल्याने भरारी ची स्वप्ने पाहू शकत नाही. एकूणच काय पुढच्या वर्षात होणारी पुणे महापालिकेची निवडणूक सर्वच पक्षांना सावधतेचा इशारा देणारी आहे . अगदी अरविंद केजरीवालांच्या आप ला देखील .आप आणि मनसे यांनी नेहमीप्रमाणे स्वतंत्रपणे निवडणूक लढविली आणि आता जुने मुखवटे बाजूला सारून नव्या उमेदीच्या प्रामाणिक चेहऱ्यांना जर संधी दिली . आणि तसे वातावरण वर्षभरात निर्माण केले तर पुढच्या निवडणुकीत हे दोन्ही पक्ष महत्वपूर्ण भूमिका बजावणारी ताकद घेऊन महापालिकेत प्रवेश निश्चित करू शकतात . पण त्यासाठी त्यांना आतापासून काही हालचाली प्रारंभ करणे गरजेचे आहे. आणि त्यांचा वर्षभरात प्रभाव टाकणे अत्यावश्यक आहे.अर्थात हे खुद्द अरविंद केजरीवाल आणि राज ठाकरे यांच्या कृतीवरच हे अवलंबून राहणार असल्याने ते काय करतात यावरच त्यांच्या महापालिकेतील दांडग्या प्रवेशाचे मोजमाप होणार आहे.
पण या दोन्ही पक्षांना खिजगणतीत न धरता अगदी कॉंग्रेस पासून भाजपा ,राष्ट्रवादी आणि शिवसेना आगामी निवडणुकीची आपापली मोट बांधू लागले आहेत . केवळ मेट्रोच्या पुण्यातील आकर्षक प्रवेशावर भाजपला निवडणूक लढविणे सोपे वाटत असेलही . पण तसे होईलच असे मानायला कोणी तयार नाही . भाजपमध्ये पूर्वी ३ नेते होते आता २च दिसत आहेत . त्यातही आता चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाचे पारडे आता तरी जड वाटते आहे .त्या खालोखाल गिरीश बापट यांचे नेतृत्व शहराला भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी बहाल केल्याचे दिसते आहे. शहरात भाजपचे सामुहिक नेतृत्व असे सांगणाऱ्या भाजपमध्ये आता संजय काकडे , योगेश गोगावले ,या सारख्या आपापल्या स्थानी बळकट राहू पाहणाऱ्या नेत्यांची अस्तित्वहीन अवस्था झाल्याचे स्पष्ट दिसले आहे. केवळ कोथरूडच्या भरवश्यावर, आणि मेट्रोच्या स्वप्नावर भाजपची सध्याची वाटचाल दिसते आहे. बाकी भाजपचे सर्व आमदार बेजान आहेत हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाहीच. त्यात आता शिवसेना भाजपबरोबर नाही , पेट्रोल, डिझेलचा ,घरगुती गॅॅसच्या दराचा , वाढलेल्या लाईट बिलांचा प्रश्न लोकांना सतावतो आहे, त्यामुळे आजच्या स्थितीत बोलायचे झाले तर पुढच्या वर्षी होणारी हि निवडणूक या पक्षाला नुसती कठीण नाही ,हि कठीणता घालविण्यासाठी आणि निवडणूक सोपी करण्यासाठी वर्षभरात भाजपचे देवेंद्र फडणवीस , चंद्रकांत पाटील नेमकी काय कृती करतील यावर या पक्षाचे निवडणुकीतील भवितव्य ठरणार आहे.
भाजपाला सर्वात जोरदार टक्कर कोण देऊ शकेल असे विचारले तर पुण्यात तरी राष्ट्रवादीचे नाव पुढे येते .हे सध्या बोलले जात असले तरी लोकांचा या पक्षावरही फारसा विश्वास उरलेला नाही . अजितदादा आणि शेवटी शरद पवार यांच्याच हाथी या पक्षाची दोर आहे. या पक्षाचे अनेक मातब्बर ,जे शहरातील लोकप्रतिनिधी आहेत ,ते भाजपशी जिव्हाळ्याचे संधान कसे बांधून खेळ खेळतात हे साऱ्याच जनतेला ठाऊक आहे. निवडणुकीत एकमेकांविरोधात उभे ठाकणारे असे’मातब्बर’ खाऊ खाण्यास भाजपसमवेत गोपनीय पार्ट्या रंगवीत असतात हे सर्व जाणून आहेत . राज्यात सरकार असतानाही महापालिकेतील भाजपशी या पक्षाची असलेली जवळीक या पक्षाला मारक ठरेल यात शंका नाही . अभिनयाला लोक दहा वेळा भुलतील अकराव्यांदा भुलतील अशी अपेक्षा बाळगून हा पक्ष निवडणुकीला सामरे जात असेल तर त्यांनाही फटका बसू शकतोच . सुरेश कलमाडीने आणलेल्या बीआरटी ला विरोध करून सत्तेवर आलेल्या या पक्षाने बीआरटी , सायकल मार्ग अशा विविध विषयांवर केलेलं राजकारण लोक विसरलेले नाहीत . आता कोरोनाच्या काळात झालेल्या मानवी बदलात त्याची तीव्रता जाणवेल असे लोकांचे मानने आहे.अकरा गावे महापालिकेत घेतली, पण वाढलेल्या हद्दीला , लोकसंख्येला देण्यासाठी महापालिकेला पाणी कोटा मात्र वाढवून देण्याची मानसिकता दाखविली गेली नाही .महापालिकेची मुख्य सभा दुध का दुध पाणी का पाणी करते असे म्हणतात , हीच मुख्य सभा प्रत्येकाच्या अभिनयाचे आणि कळकळीचे उत्कृष्ट दर्शन घडविते असे म्हणतात . पण हि मुख्य सभाच गेली वर्षभर होऊ दिली गेली नाही. ऑन लाईन चा दिखावा नक्की केला गेला . नाट्यगृहे सुरु झाली, सिनेमागृहे सुरु झाली, बसेस, रिक्षा सुरु झाल्या,नेत्यांच्या अनेक कार्यक्रमांना लोकांची उत्तुंग गर्दी झाली ,पण महापालिकेच्या मुख्य सभा मात्र सुरु झाल्या नाहीत . त्यामुळे महापालिकेतील भाजपशी राष्ट्रवादीने केलेली ही मिलीभगत होती काय ? असा प्रश्न उपस्थित झाला . या सर्व परिस्थितीत सामान्य माणसासाठी , त्याच्या गेलेल्या नौकरीसाठी , बुडालेल्या धंद्यासाठी , किंवा बुडत चाललेल्या व्यवसायासाठी ,आता हा पक्ष शेवटच्या वर्षभरात काय कृती करतोय यावर या पक्षाची पुढील ताकद अवलंबून राहणार आहे.
लागलेेले डाग अजूनही पुसता आलेले नाहीत अशी स्थिती शिवसेनेची आहे. स्थानिक नेता न लाभलेला हा देखील येथे एक पक्ष निवडणुकीला सामोरे जाणार आहे. जिथे शहराध्यक्ष कोण आहे हे नागरिकांना सांगता येणे मुश्कील आहे तोच हा पक्ष राज्यात ज्यांचा मुख्यमंत्री आहे. निव्वळ उद्धव ठाकरे यांच्या नावावर , आणि मुख्यमंत्रीपदाच्या कारकीर्दीवर या पक्षाची इथली वाटचाल असणार आहे. स्वकारकीर्दीवर विजयी होऊ शकणारे ४ नगरसेवक एवढे बळ लाभेल्या या पक्षाला आता शेवटच्या वर्षात तरी आपली भूमिका आणि कृती निश्चित करणे भाग आहे.
कॉंग्रेस , स्वातंत्र्य चळवळीतला पक्ष , ऐतिहासिक सर्वात जुना पक्ष …. आणि आता सर्वाधिक हलाखीची अवस्था बनून राहिलेला हा पक्ष निव्वळ ४ /५ स्वबळावर निवडून येणाऱ्या पण एकमेकांची तोंडे वेगवेगळ्या दिशेला असणाऱ्या, आणि आपल्या मतदार संघापुरतेच मर्यादित राहिलेल्या मजबूत खांबांवर हा पक्ष उभा आहे,ज्याचे एक नेतृत्वाचे छत्र गाडगीळांच्या हातून कलमाडी कडे नेण्यात आले.कलमाडी नंतर मात्र सामुहिक नेतृत्वाची धुरा स्वीकारलेल्या या पक्षाच्या मार्फत मागच्या दाराने जाणाऱ्या प्रत्येक आमदाराने पक्षाला लाथाडून स्वहित साधून कार्यकर्त्यांची होळी करण्यात धन्यता मानली .कलमाडी च्या अस्तानंतर पुण्याला लागलेले नेतृत्वाचे ग्रहण तसे सर्वच पक्षांना लागले. पण हानी मात्र याच पक्षाची सर्वाधिक झाली . आणि विशेष म्हणजे हा पक्ष कायमच राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या दावणीला बांधून घेऊन काम करीत राहिला हे त्याचे दुसरे वैशिष्ट्य .एका हि उपनगरात उमेदवार शोधायला ६ महिने शोधूनही मिळेनासे होतील अशी अवस्था झालेला हा राष्ट्रीय पक्ष… निव्वळ राज्यातील नेतृत्वाने या पक्षाला असे अपंगत्व बहाल केले आणि दिल्लीश्वरांनी नेमके खंबीर नेता नसल्याने राष्ट्रवादीच्या हाथी दोर सोपविल्याने हा पक्ष इतरांच्या हातातील बाहुले बनला आहे . तोही पुढच्या वर्षाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने या अखेरच्या वर्षात काय भूमिका घेईल आणि कृती काय करेल यावर त्याची पुढील वाटचाल अवलंबून राहणार आहे.