पुणे-अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा श्रीमती. सोनिया गांधी यांना केंद्रातील भाजपचे मोदी सरकार सूडबुध्दीने लक्ष करीत असून ईडीच्या चौकशीसाठी सातत्याने बोलवित आहेत. याच्या विरोधात प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेवरून आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, जिल्हाधिकारी कार्यालय येथे शांततापूर्ण सत्याग्रह करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी , रमेश बागवे, ॲड. अभय छाजेड, बाळासाहेब शिवरकर, संजय बालगुडे, आबा बागुल आदींची भाषणे झाली. या सत्याग्रहात कमल व्यवहारे, अमीर शेख, संगीता तिवारी, रजनी त्रिभुवन, गोपाळ तिवारी, रविंद्र धंगेकर, रफिक शेख, लता राजगुरू, राजेंद्र शिरसाट, हाजी जाकीर शेख, उमेश कंधारे, भगवान कडू, विनोद रणपिसे, मीरा शिंदे, सचिन भोसले, भुषन राणभरे, परवेज तांबोळी, डॉ. अनुप बेगी, मनोज पवार, कान्होजी जेधे, सौरभ अमराळे, छाया जाधव आदींसह मोठ्या प्रमाणावर पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रभारी अध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘नॅशनल हेराल्ड वर्तमान पत्राने स्वातंत्र्य चळवळीत मोलाचे योगदान दिले आहे, त्याच वर्तमान पत्राच्या खोट्या प्रकरणात सोनियाजी व राहुलजी यांची चौकशी केली जात आहे त्याचबरोबर काँग्रेस पक्ष महागाई, बेरोजगारी सारखे सामान्य माणसांचे प्रश्न हाताळत आहे. संसदेत व संसदेबाहेर काँग्रेस पक्ष भाजपा सरकारला जाब विचारत आहे त्यामुळे ईडीसारख्या कारवायांच्या माध्यमातून दबाव आणून विरोधकांना संपवण्याचे काम केले जात आहे. सोनियाजी गांधी या देशातील गोरगरीब, सर्वसामान्य पिडीत, शोषित, वंचितांचा आवाज आहेत. त्या केंद्र सरकारच्या या दडपशाहीला भीक घालत नाही. लोकशाहीत विरोधकांना असा त्रास देण्याचे काम लोकशाहीला मारक आहे. सरकारविरोधात आवाज उठवणे हा लोकशाही परंपरेचा भाग आहे पण भाजपा सरकार विरोधकांचा आवाज दडपण्याचे काम करत आहे.’’
‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना मानसिक आजार झाला आहे. म्हणूनच ते देशात देशाचे आणि तीरस्काराचे राजकारण करीत आहे. त्यांच्यात महागाईच्या राक्षसाचा शिरकाव झाला आहे आणि म्हणूनच ते देशसेवा करण्याऐवजी दोन उद्योगपती मित्रांच्या सेवेत मग्न आहेत. देव त्यांना या रोगातून लवकर मुक्त करो. पंतप्रधान म्हणून या देशातील १३० करोड जनतेसाठी नसून केवळ दोन उद्योगपतीसाठीच प्रयत्नशील असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.