चित्ररसिक घेत आहेत लाईव्ह चित्र-शिल्प स्केचेसचा आनंद
पुणे-सांगली, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना आर्थिक मदत करण्याच्या हेतूने भारतातील तब्बल दीडशे चित्रकारांच्या चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. ‘जाणीव पूरग्रस्तांची’ या नावाने भरविण्यात आलेल्या या प्रदर्शनाला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आर्ट बिट्स फाउंडेशनच्यावतीने आयोजित हे प्रदर्शन आज (शुक्रवार) आणि उद्या (शनिवार) रसिकांसाठी बालगंधर्व कलादालन येथे सकाळी दहा ते सायंकाळी आठ या वेळेत विनामूल्य पाहायला मिळणार आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन अभिनव कला महाविद्यालयाचे प्राचार्य राहुल बळवंत यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लेखक, दिग्दर्शक मुकेश चौधरी, प्रकाश कोळेकर, चक्रधर बाढेकर, आर्ट बिट्स फाऊंडेशन अध्यक्ष संतोष पांचाळ आदी उपस्थित होते.
भारतातल्या विविध प्रांतातून तब्बल दीडशे प्रसिद्ध चित्रकार या प्रदर्शनात सहभागी झाले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात चित्रकारांचा सहभाग असल्याने एकाहून एक सरस चित्रे रसिकांना पाहायला मिळत आहेत. प्रदर्शनाला भेट देणारे रसिक लाईव्ह स्केच आणि निसर्ग चित्रांच्या रेखाटनाचाही अनुभव घेत आहेत. तसेच स्वतःची स्केचही प्रसिध्द चित्रकारांकडून काढून घेत आहेत. पहिल्या दिवशी सकाळच्या सत्रात भारती विद्यापीठ कला महाविद्यालयातील विद्यार्थी अक्षय दाळे यांनी चित्रशिल्प प्रात्यक्षिके सादर केली. ही प्रात्यक्षिके पाहून कलारसिक हरखून गेले. दुपारच्या सत्रात सातारा येथील चित्रकार प्रदीप क्षीरसागर यांनी निसर्गचित्र प्रात्यक्षिके सादर केली.
या प्रदर्शनात अनेक चित्रकार कलारसिकाना आपली स्केचेस काढून घेण्याची संधी उपलब्ध करून देत आहेत. यातून मिळणारी रक्कम ही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दिली जाणार असल्याचे आयोजक आर्ट बिट्स फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष पांचाळ यांनी सांगितले.