सासवडला छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन संपन्न
सासवड-छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास जनतेसमोर येत असून, शिवक्रांतीची बीजे त्यामध्ये रोवली आहेत. याच विचाराचा जागर घरोघरी होणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन डाँ.जयप्रकाश घुमटकर यांनी केले.
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व जगतगुरु तुकोबाराय साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या अकराव्या राज्यस्तरीय छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन सासवड येथे पार पडले त्यावेळी संमेलनाध्यक्ष म्हणून डाँ. घुमटकर बोलत होते. तंजावर तामिळनाडू येथील व्यंकोजीराजे यांचे तेरावे वंशज युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन संमेलनाचे उदघाटन झाले. स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील महाराणी येशूबाईंची भुमिका करणारी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड, स्वागताध्य़क्ष शिवाजीराव कोलते, निमंत्रक आत्मारामभाऊ कामथे, राजाभाऊ जगताप, गंगाराम जाधव, संजय सोनवणे, बाळुतात्या यादव, पुरंदरच्या सभापती नलिनी लोळे, सुनील धिवार, नंदकुमार दिवसे आदी उपस्थित होते.
डाँ घुमटकर म्हणाले, पिढ्या न पिढ्या जातिवादी साहित्याची निर्मिती करणारी माणसं समाजात मिरवितात. सत्याचा शोध घेणारी पुरोगामी विचारांची मंडळी मागे राहतात. मानवाचे कल्याण ज्या साहित्यात आहे ते साहित्य सत्याचा शोध घेते. छत्रपती संभाजीराजे यांच्या साहित्यिक कलागुनांची माहिती जनतेपर्यंत गेली पाहिजे.
सरफोजी राजे यांच्या नावाने
तंजावरला साहित्य संमेलन भरविणार
तामिळनाडू (तंजावर) येथे सरफोजीराजे यांच्या नावाने साहित्य संमेलन भरविण्यात येणार असल्याचे य़ुवराज छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी सांगितले. ते म्हणाल, मराठी भाषा बोलणारा मोठा वर्ग तंजावरला आहे. संमेलनाच्या निमित्ताने महाराष्ट्र आणि तामिळनाडू यांच्यात मैत्री वाढत जाईल. देशात पहिली मुलींची शाळा सरफोजी राजे यांनी काढली होती. भरतनाट्यम नृत्याचे ते जनक आहेत.
संमेलनात छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने राज्यस्तरीय पुरस्कार देऊन साहित्यिक व कलावंताचा गौरव करण्यात आला. फुलचंद नागटिळक यांनी एकपात्री नटसम्राट सादर केला. कवी अरुण कटारे यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन झाले. राज्यभरातून कवि आले होते.
यावेळी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष शरद गोरे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, शिवाजी कोलते, आत्माराम कामथे यांनी मनोगत व्यक्त केले.
संमेलनाचे मुख्य संयोजक व ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांनी प्रास्ताविक केले. तालुकाध्यक्ष शामकुमार मेमाणे यांनी आभार मानले.