अर्थसंकल्पात शेती, शिक्षण, आरोग्यासाठी भरघोस तरतूद अपेक्षित -भालचंद्र मुणगेकर
मावळभूषण कृष्णराव भेगडे जाहीर व्याख्यानमालेचे उद्घाटन
पिंपरी / प्रतिनिधी:
देशाचे ठोस आर्थिक धोरण राबवावे, रोजगार वाढावेत, केवळ श्रीमंतांसाठी नाही, तर विकासाचे फायदे गरीबांनाही मिळण्यासाठी प्रयत्न व्हावेत, सर्वांना कौशल्यपूर्ण शिक्षण मिळावे, आरोग्याच्या दर्जेदार सुविधा गरीबांनाही मिळाव्यात, उद्ध्वस्त होत असलेली कृषीव्यवस्था सुधारण्याची आवश्यकता आहे. येत्या केंद्रीय अर्थसंकल्पातही शेती, शिक्षण, आरोग्य सुविधा, रोजगार याबाबत भरघोस आर्थिक तरतूद होणे गरजेचे आहे. गेल्या 3-4 वर्षातली अर्थव्यवस्था समाधानकारक नाही. त्यामुळे आगामी अर्थसंकल्पात विकासाचा दर कसा वाढवता येईल, याचा विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांनी करण्याची आवश्यकता आहे, अशी अपेक्षा ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आणि विचारवंत भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केली.
तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या वतीने ‘मावळभूषण कृष्णराव भेगडे जाहीर व्याख्यानमाले’चे उद्घाटन जेष्ठ अर्थतज्ज्ञ आणि विचारवंत डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या व्याख्यानाने झाले. ’भारताचे सध्याचे आर्थिक धोरण’ या विषयावर डॉ. मुणगेकर यांनी आपले विचार मांडले. यावेळी ज्येष्ठ लेखक, समीक्षक व विचारवंत डॉ. मनोहर जाधव, संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार कृष्णराव भेगडे, कार्यवाह रामदास काकडे, उपाध्यक्ष मुकुंदराव खळदे, गोरख काळोखे, खजिनदार केशवराव वाडेकर, प्राचार्य डॉ. डी. डी. बाळसराफ, व्याख्यानमालेचे संयोजक उपप्राचार्य डॉ. एस. के. मलघे, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, उद्योजिका सुनंदा काकडे, संजय साने, नंदकुमार शेलार, शैलेश शाह आदी उपस्थित होते.
ज्येष्ठ लेखक, समीक्षक व विचारवंत डॉ. मनोहर जाधव यांना ‘मावळभूषण श्री. कृष्णराव भेगडे साहित्यभूषण पुरस्कारा’ने डॉ. मुणगेकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. संत तुकाराम महाराजांची पगडी, शाल, मानपत्र व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे कार्यवाह रामदास काकडे यांनी केले. संस्थेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने संस्थेच्या वाटचालीत योगदान दिल्याबद्दल डॉ.मुणगेकर यांच्या हस्ते माजी आमदार कृष्णराव भेगडे, केशवराव वाडेकर, गोरखभाऊ काळोखे आदींना गौरविण्यात आले. नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, उद्योजिका सुनंदा काकडे, संजय साने, नंदकुमार शेलार, शैलेश शाह यांचाही सत्कार करण्यात आला. प्राचार्य डॉ. दत्तात्रय बाळसराफ यांनी डॉ. मुणगेकर यांचा परिचय करून दिला.
डॉ. मुणगेकर म्हणाले, मी कुठल्या राजकीय पक्षाच्या धोरणाविषयी बोलत नाही. मात्र, गेल्या 3-4 वर्षातली अर्थव्यवस्था समाधानकारक नाही. गेल्या 30 वर्षातला विकासाचा दर 6.50 टक्के होता. 2014 च्या दहा वर्षे पूर्वी विकासदर 8.00 टक्के होता. 2007-08 ते2011-12 या पाच वर्षात विकासदर 9.00 ते 9.50 टक्के होता. जगामध्ये सध्या ज्या अर्थव्यवस्था वाढताहेत ते दोन प्रमुख देश चीन आणि भारत आहेत. चीनचा विकासदर 20 वर्षे 9 टक्के होता. चीन हे 1999 मध्ये सुपरपॉवर होते. अमेरिका-चीन-जपान त्यानंतर भारताचा क्रमांक लागतो. आज भारताचे उत्पन्न 154 ते 156 लाख कोटी रुपये आहे. अमेरिकेचे उत्पन्न भारतापेक्षा कित्येक पटीने जास्त आहे. त्यामुळे भारताने कधीही स्वत:ला ‘सुपर पॉवर’ म्हणू नये. भारतात आज कित्येक मुले कुपोषणाचा बळी ठरत आहेत. अमेरिकेत तसे नाही. अमेरिका-चीन-जपान आणि त्यानंतर भारताचा क्रमांक लागतो. आज भारताचा विकासदर 6.50 टक्क्तांवर स्थिरावला आहे. त्यामुळे आगामी अर्थसंकल्पात विकासाचा दर कसा वाढवता येईल, याचा विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांनी करण्याची आवश्यकता आहे, असे डॉ. मुणगेकर यांनी सांगितले.
डॉ. मुणगेकर पुढे म्हणाले, आजघडीला कृषीक्षेत्रही बिकट अवस्थेतून जात आहे. कृषीव्यवस्था उद्ध्वस्थ होत आहे. अवघ्या सहा महिन्यात 13 हजार शेतकर्यांनी, तर गेल्या पाच वर्षात 3 लाख शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यातील निम्मे शेतकरी एकट्या महाराष्ट्रातील आहेत. वडीलांच्या कर्जबाजारीपणामुळे मुली आत्महत्या करीत आहेत, इतका बेजबाबदार वाढला आहे. तत्कालिन पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी आपणाला महाराष्ट्रातील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पाठवले होते. त्यावर आपण दिलेल्या अहवालानुसार डॉ. मनमोहनसिंग यांनी 3500 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले होते. येत्या केंद्रीय अर्थसंकल्पातही शेतकर्यांसाठी भरघोस आर्थिक तरतूद अपेक्षित आहे.
उद्योग क्षेत्रातही सर्वकाही अलबेल आहे असे नाही. रोजगाराच्या शोधात तरुण शहराची वाट धरत आहेत. मुंबई, पुण्यासारख्या शहरातल्या झोपडपट्ट्यात राहायला येणार्या बेरोजगारांची संख्या वाढत आहे. गेल्या दहा वर्षात औद्योगिक प्रगती झालेली नाही. संघटीत उद्योग स्थिर आहेत. मात्र, वाढत्या असंघटीत उद्योगांवर सरकारचे कसलेही बंधन नाही. कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर रोजगार दिले आहेत. अंगणवाडी सेविकांनाही किमान 8-10 हजार रुपये पगार मिळायला हवा. मात्र, तसे होताना दिसत नाही. शिक्षणसंस्था या केवळ पदव्या देणारे कारखाने झाल्या आहेत. कौशल्याधारित शिक्षणासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न व्हावेत. डार्विन चुकीचा होता की बरोबर, अशा गोष्टींवर वेळ खर्च करण्यापेक्षा उपजिवेकेसाठी कौशल्याधारित शिक्षण व्यवस्थेसाठी प्रयत्न करायला हवे, यावर ठोस धोरण राबविणे गरजेचे आहे. 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 कोटी रोजगार उपलब्ध करून देण्याचे घोषित केले होते. प्रत्यक्षात किती रोजगार उपलब्ध झाले ? त्यामुळे या अर्थसंकल्पात एम्प्लॉयमेंट धोरण सुरु करण्यासाठी विचार व्हायला हवा, अशी अपेक्षा डॉ. मुणगेकर यांनी व्यक्त केली.
देशाचा आर्थिक विकास फक्त एक टक्के श्रीमंतांसाठी न होता गरीबांसाठी व्हावा. गरीबांना शिक्षण देणार्या 1300 शाळा शिक्षण समायोजनेच्या नावाखाली बंद करणे चुकीचे आहे. फुले-शाहू-आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात हे अशोभनीय आहे, अशा शब्दात त्यांनी खंत व्यक्त केली.
आरोग्य क्षेत्रातील स्थितीही वाईट आहे. एकट्या मुंबईचा विचार केला, तर गरीब लोकांसाठी दर्जेदार आरोग्यसेवा मिळणे दुरापास्त आहे. संपूर्ण मुंबईसाठी फक्त 5 ते 6 सामान्य रुग्णालये आहेत. एकंदरीत शिक्षणाबरोबरच रुग्णालयांचेही मोठ्या प्रमाणात खासगीकरण होत आहे. त्यामुळे देशाचे आर्थिक धोरण राबविताना गरीबाला डोळ्यासमोर ठेवून धोरण राबविणे गरजेचे आहे, असेही डॉ. मुणगेकर यांनी सांगितले.
पुरस्काराला उत्तर देताना डॉ. मनोहर जाधव म्हणाले, आपण जे काम करतो, त्या कामाची समाज दखल घेत असतो. हेच या पुरस्काराने दाखवून दिले आहे. एका प्रख्यात लेखकाच्या हस्ते धाकटया लेखकाचा सन्मान होणे, हा माझा मोठा सन्मान मी समजतो.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप साकोरे यांनी, तर शैलेश शहा यांनी आभार मानले.
आज महिला सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत, हे शिक्षणामुळे शक्य झाले आहे. सावित्रीबाई फुले यांच्यामुळे हे शक्य झाले आहे. ज्याप्रमाणे 5 सप्टेंबर रोजी शिक्षकदिन साजरा करण्यात येतो; त्याप्रमाणे 3 जानेवारी हा सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन तो देशभर राष्ट्रीय महिला शिक्षक दिन म्हणून साजरा करावा,यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी करणार आहे.