पुण्याच्या तीन महापालिका करण्याची हीच ती वेळ.
पुणे- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने २३ गावांचा समावेश पुणे महापालिकेत झाल्यावर राजकीय स्तरावर या निर्णयाचे स्वागत होत असताना सामाजिक स्तरावर मात्र पुणे महापालिकेची यंत्रणा कोलमडून पडण्याची चिंता व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रिया उमटत आहेत . दरम्यान प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी देखील पुण्याच्या तीन महापालिका करण्याची हीच ती वेळ आहे अन्यथा पुणे महापालिकेची यंत्रणा कोलमडून पडेल असा इशारा दिला आहे.
या संदर्भात चौधरी यांनी असे म्हटले आहे कि,’ पुण्यात (पुणे महापालिकेच्या कक्षेत) आणखी तेवीस गावं समाविष्ट होत आहेत. सुमारे 12 लाख एवढी मोठी लोकसंख्या वाढणार आहे.या गावात ग्रामपंचायती होत्या त्यामुळे कोणत्याही पायाभूत सुविधा नाहीत. पीएमआरडीए स्थापन झाल्यानंतर या गावांचं विकास नियोजन पीएमआरडीएकडे गेलं. आपली विकास प्राधिकरणं ही फक्त टॅक्स गोळा करण्याची व्यवस्था असते. वीज, पाणी,रस्ते, सांडपाणी शुद्धीकरण, कचरा प्रक्रिया यातील एकही पायाभूत सोय पीएमआरडीए करत नाही. परिणामी विकास आराखडा आहे पण तो फक्त विकसन शुल्क घेण्यापुरता. सगळे अधिकार असलेली पण एकही कर्तव्य नसलेली ही संस्था आहे. PMRDA is power without responsibility. त्यामुळे ही गावं पुणे महापालिकेत येतांना अनेक समस्या घेऊनच येणार आहेत.पुण्यात पाण्याचा स्त्रोत मर्यादित आहे. त्यात आणखी 12 लाख लोकसंख्येला पाणी द्यावं लागणार आहे.पुणे मनपा आकारानं आधीच इतकी मोठी आहे की यंत्रणा सतत तणावात असते. आता आणखी भर पडून यंत्रणा कोलमडून जाईल अशी स्थिती आहे.या पार्श्वभूमीवर पुण्यातून मागणी व्हायला हवी की आता महापालिकेचं त्रिभाजन करा. तीन महापालिका करा. पूर्व पुणे, मध्य पुणे आणि पश्चिम पुणे. विकेंद्रीत व्यवस्था केली तरच निभाव लागेल.पुण्यातले राजकीय, सामाजिक आणि इतर क्षेत्रातील लोक, पत्रकार यांनी ही मागणी लावून धरली पाहिजे.असेही विश्वंभर चौधरी यांनी म्हटले आहे.