u
पुणे दि.23:- राज्यामध्ये महसूल वाढीचे प्रयत्न करताना नागरीकांना सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात, असे प्रतिपादन महसूलमंत्री तथा पुणे जिल्हयाचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. नोंदणी व मुद्रांक विभाग व पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने “लोकसेवेतील पुढील पाऊल” आय- सरीता प्रणाली व भाडेकरु माहिती प्रणालीची जोडणी या कार्यक्रमाचा शुभारंभ पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जमाबंदी आयुक्त् एस.चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस आयुक्त डॉ. के.व्यंकटेशम, अपर जमाबंदी आयुक्त ओमप्रकाश देशमुख, नोंदणी महानिरीक्षक अनिल कवडे, नोंदणी उप महानिरीक्षक सोनप्पा यमगर, सह नोंदणी महानिरीक्षक नयना बोंदार्डे इ. मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री पाटील म्हणाले, पुणे शहरामध्ये विविध कारणांनी स्थायिक होण्याकरीता नागरीक येत आहेत. अशावेळी ते भाडयाने घरे घेत असतात. यावेळी नोंदणी कार्यालयाकडे तसेच पोलीस विभागाकडे नोंदणी करावी लागते. त्यामुळेच त्यांचा त्रास कमी होण्याकरीता या संगणकीय प्रणालीचा उपयोग होऊ शकतो. राज्याला महसूल मिळवून देणारे जीएसटी, उत्पादनशुल्क तसेच महसूल हे प्रमुख विभाग आहेत. सध्या राज्याला नोंदणी व मुद्रांक विभागाकडून चांगला महसूल तसेच नागरीकांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होत आहे. महसूल वाढीचे प्रयत्न करताना नागरीकांना सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला नोंदणी महानिरीक्षक अनिल कवडे यांनी प्रास्ताविक करताना भाडे नियंत्रण कायदा ( महाराष्ट्र रेन्ट कंट्रोल ॲक्ट) नुसार लिव्ह ॲण्ड लायसन्स करारनाम्यांची दुय्यम निबंधकाकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे सीआरपीसी कलम 144 मधील तरतुदींनुसार घरमालकाने भाडेकरु ठेवताना सुरक्षिततेच्या कारणास्तव त्याची माहिती संबंधित पोलीस ठाण्यामध्ये सादर करणे अपेक्षित आहे. यापूर्वी अशा व्यवहारांची माहिती दोन विभागांना स्वतंत्रपणे द्यावी लागत होती. परंतु आता या संगणक प्रणालीमुळे दस्त नोंदणी करतानाच पोलीस विभागास ती माहिती घेण्याची सुविधा उपलबध करुन देण्यात आली असल्यामुळे नागरीकांचा वेळ, श्रम व खर्च कमी होणार असल्याचे तसेच सध्या पुणे जिल्हयाकरीता प्रायोगिक तत्वावर ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे सांगितले.
जमाबंदी आयुक्त एस.चोकलिंगम यांनी महाराष्ट्र राज्यातील महसूली नोंदणीची पार्श्वभूमी सांगितली. यापूर्वी 3 हजार गावठाणांचा सर्व्हे करण्यात आलेला असून उर्वरित गावांचा सर्व्हे ड्रोनच्या सहाय्याने विहीत वेळेत करण्यात येणार असल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पुणे विभागातील प्रशासनाच्या सर्वच विभागांमध्ये समन्वय असल्याने तात्काळ निर्णय घेणे सोईचे ठरत असल्याचे सांगितले. यावेळी पोलीस आयुक्त् के.व्यंकटेशम यांनीही पोलीस विभागामार्फत नागरीकांच्या सोईच्या वेगवेगळया उपक्रमांविषयीची माहिती दिली.
यावेळी उपस्थितांना नोंदणी व मुद्रांक विभागामार्फत लोकाभिमुख उपक्रम, संकल्पिात लोकाभिमुख उपक्रम, महसूल वृध्दीचा आलेख, महसूल वाढीसाठी पुढील उपाययोजना इ.बाबतची माहिती दृकश्राव्य माध्यमाद्वारे देण्यात आली.
0 0 0 0