पुणे- पुणे जिल्ह्यातील निवडणुकीच्या कामावरील अधिकारी-कर्मचारी वर्ग प्रशिक्षीत आणि कार्यक्षम असून लोकसभा निवडणूक शांततेत पार पडेल, असा विश्वास जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी नवल किशोर राम यांनी व्यक्त केला. जिल्हाधिकारी कार्यालयात केंद्रीय निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय निवडणूक निरीक्षक रजत अग्रवाल, राजेश शर्मा, राजीव श्रीवास्तव,पोलीस ऑब्झर्व्हर आयुष मनी तिवारी, विजयकुमार चढ्ढा, बारामती लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सुभाष डुंबरे, मावळच्या कविता द्विवेदी, शिरुरचे रमेश काळे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राम यांनी जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदार संघाची माहिती सांगितली. जिल्ह्यात 39 लाख 34 हजार 639 पुरुष मतदार तर 35 लाख 88हजार 223 महिला मतदार असून तृतीयपंथी 188 मतदार आहेत. मतदार नोंदणी अभियानाला चांगले यश मिळाल्यामुळे 18 ते 19 वर्षे वयोगटातील मतदारांची संख्या 54 हजार 115 असल्याचे त्यांनी सांगितले. अधिकारी-कर्मचा-यांना त्यांच्यावर सोपवण्यात आलेल्या जबाबदारीची जाणीव असून त्याबाबतचे प्रशिक्षण त्यांना देण्यात आले आहे. बैठकीत सी-व्हीजील अॅप, कायदा व सुव्यवस्था, आदर्श आचारसंहिता, दिव्यांग व्यक्तींसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या सुविधा, एक खिडकी योजना, टपाली मतपत्रिका आदींचीही माहिती देण्यात आली. इलेक्ट्रॉनिक वोटींग मशीन आणि व्हीव्हीपॅटच्या प्रात्यक्षिकाद्वारे जनतेमध्ये जनजागृती करण्यात आली आहे. यासाठी 44 वाहनांद्वारे 3257 ठिकाणी पहिल्या टप्प्यात आणि 2796 ठिकाणी दुस-या टप्प्यात प्रात्यक्षिके दाखविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
निवडणुका शांत आणि पारदर्शी वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक निरीक्षकांनी आवश्यक त्या सूचना केल्या. दिव्यांग व्यक्तींना मतदान करतांना काहीही अडचण येणार नाही याची काळजी घेण्याची तसेच निवडणुकीच्या कामासाठी तैनात करण्यात आलेल्या महिला अधिकारी-कर्मचा-यांच्या सुरक्षिततेबाबतही त्यांनी सूचना केल्या. बैठकीनंतर अपर जिल्हाधिकारी तथा प्रशिक्षण नोडल अधिकारी ज्योत्स्ना पडियार यांनी व्हीव्हीपॅट यंत्राचे निवडणूक निरीक्षकांना प्रात्यक्षिक करुन दाखविले. बैठकीस विविध विभागांचे समन्वय अधिकारी उपस्थित होते.