- हवेली तालुक्यातील सरपंच व संबंधित अधिकाऱ्यांसोबत जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी साधला संवाद
- प्रतिबंधित क्षेत्रात नियमांची कडक अंमलबजावणी करा
- गृह अलगीकरण, संस्थात्मक अलगिकरणावर प्रभावीपणे कार्यवाही करा
पुणे,: कोरोना प्रतिबंधासाठी महसूल, पोलीस व जिल्हा परिषद विभागाने समन्वय ठेवून काम करावे, अशा सूचना देऊन आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबवून हवेली तालुक्यातील कोरोनाचा रुग्णदर कमी करुया, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले.
कोरोना प्रतिबंधाच्या दृष्टीने पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील काही गावे प्रतिबंधित करण्यात येत आहेत, याअनुषंगाने जिल्हाधिकारी नवल किशोर राम व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हा परिषद सभागृहात जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, हवेली तालुक्यातील सरपंच, संबंधित तहसीलदार, समन्वय अधिकारी, विस्तार अधिकारी, तलाठी, तालुका आरोग्य अधिकारी, ग्राम विकास अधिकारी व संबंधितांसोबत बैठक घेवून चर्चा केली. यावेळी जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, उपविभागीय अधिकारी सचिन बारावकर तसेच जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
हवेली तालुक्यातील गावांमध्ये आतापर्यंत आढळलेले कोरोनाचे रुग्ण, झालेले मृत्यू, ऍक्टिव रुग्ण, बरे झालेले रुग्ण यांची ग्रामपंचायत निहाय सविस्तर माहिती जिल्हाधिकारी श्री. राम यांनी घेतली. ते म्हणाले, ग्रामीण भागातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे. कोरोनाची रुग्ण संख्या वाढू नये, यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांची चोखपणे अंमलबजावणी करावी. प्रतिबंधित क्षेत्रात जनजागृती करण्याबरोबरच नियम कडक राबवावे. यात लोकसहभाग देखील आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
अधिक रुग्ण असणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. राम म्हणाले, ग्रामीण आरोग्य सेवा-सुविधा सक्षम करण्यासाठी, तसेच साधनसामग्री उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी मदत करेल. नऱ्हे, देहू अशा मोठ्या गावांमध्ये स्वॅब तपासणी केंद्र लवकरात लवकर सुरु करावे. तसेच कॉन्टॅक्ट ट्रेसिंग प्रभावीपणे करावे. गृह अलगिकरण, संस्थात्मक अलगिकरणावर लक्ष द्यावे. रुग्ण वाढत असणाऱ्या ठिकाणी कोविड केअर सेंटर वाढवण्यासाठी नियोजन करुन कार्यवाही करा. अवाजवी शुल्क आकारणाऱ्या रुग्णालयांची माहिती जिल्हा प्रशासनाला द्या, जेणेकरुन दोषींवर कारवाई करता येईल, असे सांगून गृह अलगीकरणातील व्यक्ती बाहेर फिरताना आढळल्यास कारवाई करा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
विस्तार अधिकारी, मंडल अधिकारी यांनी ग्रामपंचायतींना वेळोवेळी भेटी देऊन समन्वय साधून काम करावे, सगळे मिळून काम करुया आणि कोरोनावर नियंत्रण मिळवूया, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
प्रशासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या उपाययोजना, उपलब्ध मनुष्यबळ, नागरिकांना देण्यात येणाऱ्या आरोग्य विषयक सेवा सुविधा यांचाही त्यांनी आढावा घेतला.
मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद म्हणाले, ग्रामीण भागातील कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार ग्रामपंचायतींनी कार्यवाही करावी. टीम वर्क म्हणून सगळे मिळून काम करुन कोरोनाचा फैलाव रोखुया, असे ते म्हणाले. प्रतिबंधित क्षेत्रात सर्व्हेक्षण करण्यावर भर द्यावा. गावात ठराविक कुटुंबनिहाय एक असे समन्वय अधिकारी नियुक्त करुन बाधित व्यक्ती, संपर्कात आलेले व्यक्ती व सद्यपरिस्थितीची माहिती अद्ययावत ठेवा, असे सांगून मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींकडून दंड आकारणी करा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
बैठकीत उपस्थित सरपंच, व अधिकाऱ्यांनी उपाययोजना राबविताना येणारे अनुभव व आवश्यक सहकार्य याबाबत माहिती दिली.