पुणे दि. 23 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या शासन निर्णयाप्रमाणे आत्मनिर्भर भारत वित्तीय सहायक पॅकेजअंतर्गत केंद्रशासनाने दिलेल्या निर्देशानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत तसेच कोणत्याही राज्य योजनेमध्ये समाविष्ट नसलेल्या विनाशिधापत्रिकाधाकांना माहे मे व जून 2020 या दोन महिन्याच्या कालावधीकरीता प्रतिव्यक्ती प्रतिमाह 5किलो तांदूळ मोफत देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.
आत्मनिर्भर भारत वित्तीय सहायक पॅकेज अंतर्गत जे विस्थापित मजूर, लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या किंवा राज्य शासनाच्या कोणत्याही योजनेच्या शिधापत्रिका नाहीत. अन्न धान्याची गरज असलेले सामाजिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विस्थापित मजूर, रोजंदारी मजूर अशा प्रकारच्या व्यक्तींना प्रती माह 5 किलो तांदूळ देय आहे. अशा कुटुंबातील व्यक्तींनी 27 मे 2020 पर्यंत संबंधित गाव कामगार तलाठी, ग्रामसेवक,अध्यक्ष, ग्राम दक्षता समिती यांचेकडे उपलब्ध करुन दिलेला अन्नधान्य मागणी साठीचा विहित नमुन्यातील अर्ज भरुन जमा करावा. अर्जासोबत मोबाईल क्रमांक व आधार कार्डाची झेरॉक्स आधार कार्ड नसल्यास ओळखीबाबत इतर पुरावा अर्जासोबत सादर करावा. अर्जाचे छाननी नंतर पात्र लाभार्थ्याना 1 जून नंतर मोफत धान्य वाटप करण्यात येईल. अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी, भानुदास गायकवाड यांनी दिली आहे.