पुणे-
राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियान (एनएमसीजी) आणि राष्ट्रीय शहरी व्यवहार संस्था (एनआययुए) यांनी पुणे येथे संयुक्तपणे आयोजित केलेल्या “धारा” अर्थात शहरी नद्यांसाठी समग्र कृती विषयक उपक्रमाअंतर्गत वार्षिक बैठकीच्या उद्घाटन सत्राला केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या अध्यक्षतेखाली 13 फेब्रुवारी रोजी प्रारंभ झाला.
धारा 2023 ही “रिव्हर सिटीज अलायन्स” च्या सदस्यांची वार्षिक बैठक असून या माध्यमातून स्थानिक जलस्रोतांचे व्यवस्थापन आणि त्यासंबंधीचे उपाय जाणून घेण्यासह विचारमंथन करण्याच्या उद्देशाने सह शिक्षणासाठी, आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, वरिष्ठ अधिकारी, भारतातील 100 सदस्यीय नदी शहरांचे ज्येष्ठ नियोजक तसेच मुख्य अभियंता यांना व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
एनएमसीजीचे महासंचालक, जी. अशोक कुमार,पुणे महानगर पालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, एनआययुएचे संचालक हितेश वैद्य, हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. सुरुवातीच्या सत्रात अयोध्या आणि औरंगाबादसाठी नागरी नदी व्यवस्थापन योजना आणि ‘75 रिव्हर इनिशिएटिव्ह्स’ – या विषयावर एक संकलनही सादर करण्यात आले.
नद्या या नेहमीच नागरी सभ्यतेशी एकरूप होत असतात आणि गेली कित्येक दशके आपण आपल्या जगण्यासाठी या नद्यांचा वापर केल्यानंतर आता आपण या नद्यांना काय देऊ शकतो यावर चिंतन करण्याची वेळ आली आहे, अन्यथा आपल्या भावी पिढीला पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागेल, असे श्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले. आज या कार्यक्रमाला 40 हून अधिक महापालिका आयुक्त उपस्थित आहेत आणि जलस्त्रोतांचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यासाठी वि-केंद्रीकृत नियोजनाचे महत्त्व याविषयी वचनबद्धता दाखवल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर नियोजन उत्तम प्रकारे केले जाऊ शकते आणि म्हणूनच त्यांच्या उपस्थितीला येथे खूप महत्त्व आहे,” असे ते म्हणाले. “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून आपण लोकांशी थेट जोडले जाऊ शकतो आणि पाण्याशी संबंधित कोणत्याही उपक्रमाच्या यशस्वितेसाठी ते अत्यंत महत्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले.
देश एका निर्णायक काळातून जात असून, स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत, असे शेखावत म्हणाले. जग आपल्या विकासाकडे मोठ्या अपेक्षेने पाहत असून विशेषतः जेव्हापासून भारताने जी 20 चे अध्यक्षपद ग्रहण केले आहे, तेव्हापासून जगाचे भारताकडे लक्ष आहे, असे ते म्हणाले.
आपल्या जल विषयक उपक्रमांची व्याप्ती केवळ पायाभूत सुविधांच्या विकासापुरती मर्यादित न ठेवता लोकांना नद्यांशी जोडण्याचा प्रयत्न आपण जोमाने करायला हवा, असे त्यांनी सांगितले. आपल्या पूर्वजांच्याकडून चालत आलेल्या पारंपारिक ज्ञानाचा भाग म्हणून आणि आता एकेक पिढीनंतर कमी होत गेलेला पाण्याबद्दलचा आदर पुन्हा प्रस्थापित करणे आवश्यक आहे,” असे ते म्हणाले, “सध्याच्या काळातल्या एका शक्तिशाली साधनाच्या म्हणजे समाज माध्यमांच्या मदतीने आपणच ती भावना तरुण पिढीमध्ये निर्माण करण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले
जलशक्ती मंत्रालय प्रत्येक कुटुंबाला सुरक्षित पेय जल पुरवण्यासाठी , भूजल व्यवस्थापन आणि पुनर्भरण, एक्वाफर मॅपिंग, नदी पुनरुज्जीवन या सर्व स्तरावर कार्य करत आहे आणि जलक्षेत्रासाठी सर्वात जास्त आर्थिक निधी देणाऱ्या देशांपैकी भारत एक देश आहे, असे शेखावत म्हणाले.
आपल्या उद्घाटनपर भाषणात एनएमसीजीचे महासंचालक, जी. अशोक कुमार यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. गंगा नदी आणि तिच्या उपनद्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी नमामि गंगे कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. “नमामि गंगा कार्यक्रमाची निवड 160 हून अधिक देशांमधून जगातील अव्वल 10 प्रमुख कार्यक्रमांपैकी एक म्हणून करण्यात आली आहे आणि हेच नमामि गंगे कार्यक्रमाच्या यशाचे द्योतक आहे.” असे ते म्हणाले.
धारा 2023 च्या पहिल्या दिवशी ‘भारतातील नदी व्यवस्थापनाची अभिनव उदाहरणे’, ‘नदी व्यवस्थापनासाठी नाविन्यपूर्ण आंतरराष्ट्रीय केस स्टडीज’, ‘शहरी नदी व्यवस्थापनासाठी अजेंडा मजबूत करणे’, ‘नद्यांसाठी युवा ’, ‘आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या नदी शहरांचे अनुभव’. या विषयांवर विविध सत्रे आयोजित करण्यात आली होते.