पुणे-
राज्याकडे करोनाप्रतिबंधित लसीचे तब्बल पाच लाख ९८ हजार डोस शिल्लक असताना सत्ताधारी असलेल्या महाविकास आघाडीतील मंत्री पुरेशा लसी मिळत नसल्याचे खापर केंद्र सरकारवर फोडत आहेत, अशी टीका सभागृह नेते गणेश बिडकर यांनी केली. केंद्राने राज्याला लसी दिलेल्या असतानाही खोटे बोलून नागरिकांच्या मनात द्वेष निर्माण करण्याचे काम राज्यकर्ते करत असल्याचा आरोप देखील बिडकर यांनी केला आहे.
कोणत्या राज्याला किती लसींचा पुरवठा करण्यात आला आहे. तसेच पुढील काळात केंद्राकडून किती लसी मिळणार आहेत, याची आकडेवारीच केंद्र सरकारने जाहीर केली आहे. या आकडेवारीमधून महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचा खोटारडेपणा समोर आला आहे. जाहीर झालेल्या माहितीनुसार सद्यस्थितीला राज्याकडे करोना प्रतिबंधित लसीचे पाच लाख ९८ हजार ५५ डोस शिल्लक आहेत. मग राज्य सरकारमधील काही मंत्री कोणत्या निकषावर म्हणतात, की केंद्राने राज्याला मदत केली नाही आणि राज्यामध्ये लसींचा तुटवडा आहे ? या बद्दल मुख्यमंत्री स्पष्टीकरण देतील का ? अशी विचारणा बिडकर यांनी केली आहे.
केंद्राने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार चार लाख लसी पाइपलाइन मध्ये असून लवकरच हा साठा राज्याला मिळणार आहे, यावरून केंद्र सरकार राज्य सरकारला मदतच करत असल्याचे दिसून येत आहे, मग राज्यकर्ते केंद्राच्या नावाने खडे का फोडत आहेत.
राज्याकडे एवढा मोठा लसींचा साठा शिल्लक असताना आणि पुणे शहर करोनाचा हॉटस्पॉट असताना राज्याकडून शहराला केवळ २३ हजार लसी दिल्या जातात, यावरून माहविकास आघाडी सरकारने लसीकरण मोहीम किती गांभीर्याने घेतली आहे याचा अंदाज येतो, अशी टीका देखील सभागृह नेते बिडकर यांनी केली आहे.
करोनामुळे संपूर्ण देश त्रस्त आहे. मात्र महाराष्ट्रातील जनता केवळ करोनामुळे नाही तर महाविकास आघाडी सरकारच्या अकार्यक्षमतेनेही हैराण झालेले आहेत. जनतेने प्रश्न विचारून त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली पाहिजे.
- गणेश बिडकर, सभागृह नेता, पुणे महापालिका