पुणे-‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या पुणे जिल्ह्याच्या मावळ, खेड आणि जुन्नर तालुक्यातील विविध गावांना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी भेट देऊन पाहणी केली.
मावळ तालुक्यातील भोयरे, पवळेवाडी, खेड तालुक्यातील करंजविहीरे, शिवे गावांना भेट देऊन येथील नुकसानीची पाहणी केली.
बाधित शेतकरी, नागरिक, गावकरी यांच्याशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. उपस्थित शासकीय अधिकाऱ्यांना नुकसानीचे तातडीने वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश दिले. कोणत्याही बधितांचे नुकसानीचे पंचनामे राहता कामा नयेत, अशा स्पष्ट सूचना दिल्या.
यावेळी आ. सुनील शेळके, जिल्हाधिकारी नवल किशोर राम उपस्थित होते. पवळेवाडी येथील पॉलीहाऊसचीही त्यांनी पाहणी केली.
निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड आणि पुणे जिल्ह्यातील काही तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असून त्यासाठी पाहणी दौरा आयोजित करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.