पुणे- आंबील ओढ्याला सीमाभिंत बांधण्याचे काम दिलेल्या ‘त्या ‘ ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून त्यावर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या नगरसेविका अश्विनी कदम यांनी महापालिका आयुक्तांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात अश्विनी नितीन कदम यांनी असे म्हटले आहे कि ,’ 25 सप्टेंबर च्या आंबील ओढ्याच्या पुरानंतर पुणे महानगरपालिकेच्या वतीने नाल्यालगत सिमाभींतीची निविदा प्रक्रिया राबवण्यात आली होती. सदर निविदा प्रक्रियांमध्ये सावि कन्स्ट्रक्शन पात्र होऊन त्यांना वर्कऑर्डर सुद्धा देण्यात आली होती. परंतु पाच महिने वर्क ऑर्डर देऊन सुद्धा ते काम सुरु करू न शकल्यामुळे आपल्या मलनिस्सारण खात्याने त्यांची निविदा रद्द करून फेरनिविदाचा प्रस्ताव सादर केला आहे.
या संदर्भामध्ये खात्याशी पाठपुरावा करत असताना फक्त निविदा रद्द करून फेरनिविदा करणे याच मुद्द्याची मान्यता दिलेली आहे. मुळात सदरच्या कामासाठी आधीच उशीर झालेला असताना सदर ठेकेदारमुळे काम होऊ शकले नाही व निविदा रद्द करण्याची नामुष्की मनपावर आली. 20 कोटीच्या पूर्ण कामातील 1.76 कोटीतुन 285 मीटर सीमा भिंतीच्या कामाची कात्रज परिसरात सुरुवात झाली असून उरलेल्या 18 कोटीतुन 2600 मीटर करायच्या सीमाभिंतीचे काम सावि कन्स्ट्रक्शन च्या माध्यमातून अद्याप सुरू होऊ शकले नाही.याचा फटका गेले दीड वर्ष या भागात राहणारे नागरिक सोसत आहेत.
परत पूर आला तर करायचे ? प्रत्यक्षात निविदा कधी काढणार ? त्यानंतर काम कधी सुरू होणार? ते पावसाळ्यापर्यंत पुर्ण होणार का ? काम पूर्ण नाही झाले तर पावसाळा कसा काढायचा? अशा सगळ्या विचाराने नागरिक त्रस्त आहेत.
अशा सर्व परिस्थितीला जबाबदार असणाऱ्या या ठेकेदारावर मेहरबानी नको.
खात्याने सुचविल्याप्रमाणे १% बायणा रक्कम व परफॉर्मन्स सिक्युरिटी रक्कम जप्त करून त्याच्यावर कठोर आर्थिक दंडा सहित काळा यादीत टाकण्याची कारवाई तातडीने आपल्या मार्फत करण्यात यावी अन्यथा आम्ही आंबील ओढालगत राहणाऱ्या सर्व नागरिकांच्यावतीने तीव्र आंदोलन करू याची नोंद घ्यावी.असेकदम यांनी म्हटले आहे.