पुणे, ता. २२ – धर्मांतर, गोहत्या आणि लव जिहाद यासाठी कडक कायदे करावेत व त्यांची कठोर अंमलबजावणी करावी आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस धर्मवीर दिन म्हणून साजरा करावा या मागण्यांसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने आज ‘हिंदू जन आक्रोश मोर्चा’चे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात ५० हजारहून अधिक हिंदू नागरिक सहभागी झाले होते.
महाराष्ट्रात आणि देशात लव्ह जिहाद, सक्तीचे धर्मांतर आणि गोहत्या ह्या चिंताजनकरित्या वाढत्या घटनांच्या विरोधात कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी अशी मागणी ह्या मोर्चाद्वारे हिंदू समाजाकडून करण्यात आली.
ह्या वेळी जनसमुदयाला संबोधित करताना जाती, धर्म, पंथ, गोत्र बाजूला ठेवून सकल हिंदू समाजाने एकत्र येण्याची गरज आहे असे तेलंगणचे आमदार राजा भैय्या यांनी सांगितले.
छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर म्हणून घोषित करावे आणि त्यांचा बलिदान दिवस धर्मवीर दिन म्हणून साजरा करावा अशी आग्रहाची मागणी आमदार शिवेंद्र राजे भोसले यांनी राज्य सरकारकडे केली.
ह्यावेळी ‘तुकाराम महाराजांचे वंशज हभप शिवाजीराव मोरे, शिवशंभू अभ्यासक नीलेश भिसे, पतीत पावन संघटनेचे स्वप्नील नाईक, धिरज घाटे, हिंदू राष्ट्र सेनेचे धनंजय देसाई यांनी मोर्चाला संबोधित केले. महाराष्ट्रात आणि देशात लव्ह जिहाद, सक्तीचे धर्मांतर आणि गोहत्या विरोधात कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी अशी एकमुखी मागणी सर्व मान्यवरांनी केली.
आज सकाळी दहा वाजता ऐतिहासिक लाल महाल येथून मोर्चाची सुरूवात झाली . श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची महाआरती करून लक्ष्मी रस्त्याने डेक्कन परिसरातील धर्मवीर संभाजी महाराजांच्या स्मारकाजवळ मोर्चाची सांगता झाली.
हा मोर्चा अभूतपूर्व होता. शहरातील सर्व राजकीय पक्ष, हिंदुत्ववादी संघटना, व्यापारी, गणेशोत्सव मंडळे या मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चातील महिलांचा प्रचंड सहभाग लक्षणीय होता. तसेच वारकरी संप्रदायातील विद्यार्थ्यांची देखील मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. सकल हिंदू समाजाच्या ताकदीचे या निमित्ताने विराट दर्शन आज घडले.
छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज ह्यांच्या ऐतिहासिक भेटीनंतर आज सुमारे चारशे वर्षांनंतर पुनः एकदा त्यांच्या वंशजांची प्रथमच एका व्यासपीठावर भेट झाली अशी माहिती इतिहास अभ्यासक निलेश भिसे यांनी दिली.