शिवशंकरभाऊंच्या निधनाने
विवेकानंद केंद्राने आत्मज गमावला: भानुदासजी
पुणे :
‘ शेगावच्या श्री गजानन महाराज संस्थानचे कार्यकारी व्यवस्थापक शिवशंकरभाऊ पाटील यांच्या निधनामुळे विवेकानंद केंद्र परिवाराने एक आत्मज गमावला आहे ‘, अशी प्रतिक्रिया केंद्राचे महासचिव भानुदासजी यांनी व्यक्त केली आहे.शेगाव संस्थानचे विश्वस्त शिवशंकरभाऊ पाटील यांचे आज निधन झाले, त्यानंतर विवेकानंद केंद्राने या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
‘शिवशंकरभाऊ हे शेगावच्या श्री गजानन महाराज संस्थानचे कार्यकारी व्यवस्थापक होतेच, परंतु ते एक सच्चे विवेकानंद भक्त, निष्काम कर्मयोगी, पारदर्शी आर्थिक व्यवहार जगणारे विनम्र विश्वस्त होते. आपल्या अबोल कृतीतून त्यांनी विवेकानंद केंद्र कार्यकर्त्यांनाच नव्हे तर गजानन महाराज संस्थानच्या कोट्यवधी साधकांना, सेवकांना व भक्तांना खूप काही शिकवले ‘, अशी प्रतिक्रिया भानुदासजी यांनी व्यक्त केली आहे.
2013 साली स्वामी विवेकानंद यांच्या जन्माला 150 वर्ष पूर्ण झाली तेव्हा स्थापन झालेल्या स्वामी विवेकानंद सार्ध शती महोत्सव समितीचे ते महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष होते. विवेकानंद केंद्राचे अनेक मोठे व महत्वाचे कार्यक्रम त्याकाळात शेगाव संस्थानामध्ये पार पडले. भाऊ त्या कार्यक्रमांना उपस्थित असत, परंतु संस्थानामधल्या चहाच्या कपालाच काय, लवंग-वेलदोड्यालाही भाऊ स्पर्श करीत नसत, हे अनेकांना स्पर्शून जात असे अशी आठवण सार्ध शती महोत्सव समितीचे तत्कालीन सचिव सुधीर जोगळेकर यांनी व्यक्त केली.
विश्वस्त या संकल्पनेला सर्वार्थाने जागणारा, संस्थानसाठी कोट्यवधी रूपयांच्या देणग्या मिळत असतानाही, जेवढ्या रकमेचा विनियोग करणे संस्थानला शक्य आहे, व जेवढ्याची गरज आहे तेवढीच रक्कम स्वीकारणारा, संस्थानच्या दैनंदिन आर्थिक व्यवहारांचा ताळेबंद पूर्ण झाल्यानंतरच घरी परत जाणारा असा विश्वस्त होणे नाही, अशी प्रतिक्रियाविवेकानंद केंद्राचे महाराष्ट्र प्रांत प्रमुख अभय बापट यांनी व्यक्त केली आहे.