पुणे- केवळ एका पत्रकाराचाच नाही तर पुण्यात किती जणांचे गलथानपणामुळे मृत्यू झालेत .. असा प्रश्न आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांना विचारला जाऊ लागला आहे.
तुम्ही काहीही करा ,तुम्ही हाथमोजे घाला , भारीतल्या भारीत मास्क घाला , कोणाचाही आक्षेप नाही. पण अँब्यूलन्सची पुण्यात होणारी गैरसोय , उपलब्ध न होणारे बेड , महामारीच्या नावाने होणारी लुटमार या प्रकरणी प्रश्न विचारायला येणाऱ्या पत्रकारांना पुण्याच्या विधानभवनाबाहेर रस्त्यावर तास न तास उभे करून ठेवणारे तुम्ही पहिलेच दादा , पत्रकारांच्या माईक्सवर सॅनिटायझर चे फव्वारे मारणारे तुम्ही पहिलेच दादा …तुम्ही तुमची काळजी नक्कीच घ्यायला हवी ,आम्हीही आमची काळजी नक्कीच घ्यायला हवी . पण भारतात या रोगाचा शिरकाव जर होऊ द्यायचाच नाही ,याची दक्षता फेब्रुवारीतच घेतली असती तर आज हजारो जीव वाचले नसते का हो ? लाखो कुटुंबे उध्वस्त झाली नसती ना …. पण ते सारे होऊन गेल्यावरही … पुण्यातील आरोग्य यंत्रणेतील ढिसाळपणा सुरूच राहिला , शेखर गायकवाडसारख्या आयुक्तांची तुम्ही बदली केली . पण या बदलीने तुम्ही नेमके काय साधले हो ? महापालिकेचे किती हॉस्पिटल्स बंद आहेत ? किती सुरु आहेत ? किती आरोग्य सेवक कामावर राबतात,अन त्यांना आपण किती पगार देतो ?त्यातल्या किती जणांची नौकरी परमानंट आहे? ,अन किती दांड्या मारून घरी बसलेत ? या प्रश्नांचे हि उत्तरे कोणी द्यायला नको काय ? या कारभारावर कोणाचा अंकुश आहे हो दादा ? इथले महापौर राब राब राबताना दिसतात शिवाय आरोग्य यंत्रणेवर शेकडो कोटीच्या ढीगभर गप्पा होतात . पण महामारीला रोखण्यात यंत्रणेला यश आले नाही . आता एका पत्रकाराच्या मृत्यू नंतर तुम्ही म्हणे चौकशीचे आदेश दिलेत .. कोण करणार हि चौकशी , ज्यांच्यावर जबाबदारी होती, तेच करणार ? तेच अहवाल देणार ? कोणाला जबाबदार धरणार ? बरे सुरुवातीपासूनच झालेला ढिसाळ कारभार त्याचे काय ? त्याने किती बळी घेतलेत ? किती संसारे उध्वस्त झालीत ? याची कोण चौकशी करणार ? किती जणांच्या नौकऱ्या गेल्यात , किती जणांचा पगार थांबला याची कोण चौकशी करणार ? दादा , तुम्ही राजकारणातले दादा .. समाजकारणातले दादा … ठरवले तर काहीही करू शकता ? काय करायची ती व्यवस्था करा .. पण खरे सांगा , पुण्यातल्या गलथान कारभाराने नेमके किती बळी गेलेत …. ? भले कोणा जबाबदार बड्या धेंडांवर वर कारवाई नाही केली तरी …,पण कोरोना योद्धा असलेल्या ,मरण पावलेल्या किती जणांच्या कुटुंबाना २५ लाख ,५० लाख , 1 कोटी दिलेत ते सांगायला तरी पुढे या … येणार ना, दादा … ?