राष्ट्रवादीचे नितीन कदम यांचे गृहमंत्र्यांना साकडे
पुणे -जीवघेण्या कोरोनाचे निमित्त साधून अव्वाच्या सव्वा दराने होणारी वैद्यकीय साहित्य खरेदी असो किंवा पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नाल्यांची साफसफाई, मोजक्या बिल्डर्ससाठी कागदोपत्री आणि नियमबाह्य रस्ते रुंदीच्या नावाखाली टीडीआरचा प्रस्ताव यासह अनेक प्रकरणात पुणेकरांच्या हिताऐवजी स्वहित जोपासण्याचा कारभार करणाऱ्या पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजपला आता राज्यसरकारने चौकशी करून लगाम घालावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पर्वती मतदार संघाचे अध्यक्ष नितीन कदम, प्रदीप देशमुख, भोलासिंग अरोरा, विजयबापू डाकले व मृणाल ववले यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना निवेदनाद्वारे केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे भेटीवर आलेल्या गृहमंत्री देशमुख यांची भेट घेऊन नितीन कदम यांनी भाजपच्या अनागोंदी कारभाराचा लेखाजोखाच मांडला. जलपर्णी, बीआरटी , नाल्यांची साफसफाई यासह अनेक प्रकरणात सत्ताधारी भाजपने मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला आहे .
आता तर कोरोनाच्या नावाखाली वैद्यकीय साहित्य खरेदीतही मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही नितीन कदम यांनी केला आहे.प्रतिबंधित क्षेत्रात अन्नधान्य किटही नागरिकांना मिळाल्या नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर असून ज्यांना किट मिळाले, त्यातील अन्नधान्याच्या वस्तू गायब असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. स्थायी समितीमध्ये दर आठवड्याला बेकायदेशी ठराव बहुमताच्या जोरावर मान्य केले जात आहेत.सत्तेवर आल्यापासून भाजपचा कारभार हा पुणेकरांच्या हिताचा नाही.
मात्र आता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे, त्यामुळे बहुमताच्या जोरावर मनमानी कारभार करणाऱ्या पुण्यातील सत्ताधारी भाजपला आता राज्यसरकारने लगाम घालण्याची गरज आहे ,त्याचबरोबर कोणताही प्रस्ताव जो पुणेकरांच्या हिताचा नाही तो तत्परतेने आणणाऱ्या पालिका प्रशासनालाही खडेबोल सुनावण्याची वेळ आली आहे, याकडेही नितीन कदम यांनी लक्ष वेधले आहे.