पुणे – परवा झालेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर अंबील ओढ्याची महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पाहणी केली. यावेळी राष्ट्रवादीच्या नागरसेविका अश्विनी कदम, मलनिस्सारण विभागाचे खानोरे, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर, धनकवडी-सहकारनगरचे सहायक आयुक्त निलेश देशमुख उपस्थित होते.
वर्षानुवर्षे माती येऊन अंबील ओढ्याची खोली कमी झाली आहे. एक दोनदा जोरदार पाऊस झाला की लगेच ओढ्याला पूर येतो. आजूबाजूला राहण्याऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण तयार होते, असे अश्विनी कदम यांनी सांगितले.
कात्रज तलावाचे पावसाळ्यात धरणाप्रमाणे पाणी सोडण्याचे नियोजन करावे, जेणे करून पूर परिस्थिती निर्माण होणार नाही, प्राईम मुव्हने केलेल्या सर्वेनुसार अतिक्रमणमुक्त करून २२मीटर नाला रुंद करावा.
कात्रज ते म्हात्रे पुलापर्यंत अंबील ओढ्याची खोली आणि रुंदी पुढच्या 50 वर्षांचा विचार करून होणे गरजेचे आहे. नाला ऊगम स्थानापासून जसे जसे पुढे जाऊ तशी रुंदी-खोली वाढली पाहिजे. जेणेकरून भविष्यात ढगफुटीसारखी परिस्थिती झाली तरी पूरस्थिती होणार नाही.
अंबील ओढ्याच्या दोन्हीबाजूची अतिक्रमण काढणे आवश्यक आहे जेणे करून भविष्यात वित्तहानी आणि मनुष्यहानी होणार नाही, याची काळजी घ्यावी, सीमाभिंत तातडीने बांधून लगतच्या नागरिकांना सुरक्षा द्यावी, अंबील ओढ्या लगतच्या गावांनी घोषित वस्तीमधील बाधित होणाऱ्या नागरिकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात यावे, अशा अनेक उपाययोजना करण्याची मागणी अश्विनी कदम यांनी केली.