पुणे-कोविड -१९उपाययोजना संदर्भात पुणे महापालिकेने उभारलेल्या यंत्रणेची उच्च न्यायालयाने स्वतः चाचणी करून ही यंत्रणाच कुचकामी असल्याचे सिद्ध केल्याने आता प्रशासनावर जबाबदारी ढकलून मोकळे न होता महापौर मुरलीधर मोहोळ यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तत्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे पर्वती अध्यक्ष नितीन कदम यांनी केली आहे.तसेच या प्रकरणात अतिरिक्त आयुक्तांसह जे जे अधिकारी दोषी आहेत त्यांच्याकडील कारभार काढून त्यांची चौकशी करावी असेही नितीन कदम यांनी म्हटले आहे.
याबाबत नितीन कदम यांनी म्हटले आहे की, कोरोना संदर्भात महापालिका प्रशासनाने केलेल्या उपाययोजना मुळात संशयास्पद आहेत. जंबो कोविड हॉस्पिटल उभारण्यात आले मात्र त्यासाठी सुरू केलेली हेल्प लाईन आणि प्रत्यक्षात किती बेड उपलब्ध आहे या यंत्रणेतील सावळा गोंधळ अखेर उच्च न्यायालयाने स्वतः फोन करून घेतल्याने उघडकीस आला आहे.महापौर मुरलीधर मोहोळ हे प्रारंभीपासूनच कोविड संदर्भात उपाययोजना करण्यात काही विशिष्ट आणि वरिष्ठ पालिका अधिकाऱ्यांसमवेत कामकाज करत आहेत.वास्तविक कोरोना सारख्या महामारीच्या काळात जनतेला दिलासा देण्यासाठी सर्व पक्षियांना बरोबर घेवून काम करणे आवश्यक होते मात्र तसे काही घडले नाही. कोरोना नावाखाली केवळ अनागोंदी कारभार झाला आणि त्यात नागरिकच भरडले गेले.एकप्रकारे त्यांनाच वेठीस धरले गेले.आता मध्यंतरी प्रशासन ऐकत नाही ही सारवासारव त्यातूनच सुरू झाली होती. त्यामुळे कोरोनाच्या नावाखाली गत वर्षापासून ते आजतागायत किती आणि कसा खर्च झाला.पुणेकरांना त्याचा कसा लाभ मिळाला.किती रुग्ण बरे झाले .एकूण किती रुग्णांनी जंबो कोविड हॉस्पिटल मध्ये उपचार घेतले,त्यांचे नावे आणि संपर्क क्रमांक यासह वरील मुद्द्यांची श्वेत पत्रिका काढावी याकडेही नितीन कदम यांनी लक्ष वेधले आहे.
आज उच्च न्यायालयाने स्वतः बेड बाबत खातरजमा केल्याने हा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला आहे.
केवळ कोरोनाच्या नावाखाली कागदोपत्री कारभार करून पुणेकरांना लुटण्यात आले आहे.हे यातून सिद्ध होत आहे.कार्यक्षमता नाही आणि पारदर्शक कारभारही नाही हेच अधोरेखित झाल्याने महापौर मुरलीधर मोहोळ यांना महापौर पदावर राहण्याचा नैतिक अधिकारही नाही.याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.त्याचप्रमाणे अतिरिक्त आयुक्त आणि संबंधित अधिकारी यांचे तात्पुरते निलंबन करून या सर्व प्रकारची चौकशी करावी अशी मागणीही नितीन कदम यांनी केली आहे.