पुणे ता २१ : दहशतवाद ही गंभीर समस्या आहे. जगातील बहुतूक देश त्यामुळे त्रस्त झालेले आहेत. दहशतवादाच्या लढाईत अमेरिका सर्व शक्तीनिशी भारताच्या पाठीशी उभी आहे. असा विश्वास अमेरिकेचे वाणिज्य दूत डेव्हिड रांझ यांनी शनिवारी व्यक्त केला. पुणे भेटीत रांझ यांनी लोकसभेच्या अंदाज समितीचे अध्यक्ष खा. गिरीश बापट यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
महापौर मुक्ता टिळक, भाजप युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा स्वरदा बापट, डेव्हिड रांझ यांच्या पत्नी टॅली लिंड, दूतावासाचे प्रतिनिधी रॉबर्ट पॉलसन – हॉसर, माहिती अधिकारी निक नोवॉक, सल्लागार अरुंधती मुंडलाय, सुरक्षा अधिकारी डेव्हिड पराईल यावेळी उपस्थित होते.
रांझ यांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडींसह, दहशतवाद, राज्यात होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणूका, जम्मू काश्मीर, पाकव्याप्त काश्मीर, कलम ३७०, भारत अमेरिका सबंध याविषयी विवरण केले.
त्यावेळी बोलताना बापट म्हणाले की ,देशात भाजप सरकार आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने कठोर पावले उचलायला सुरुवात केली. याचे परिणाम आता दिसत आहेत. भारतावर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर त्याला सर्जिकल स्ट्राईक द्वारे चोख प्रत्युत्तर भारताने दिले. सीमेपलीकडील दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही हे ठणकावून सांगितले. कलम ३७० द्वारे काश्मीरला देण्यात आलेला विशेष दर्जा समाप्त केला. आता काश्मीर हे भारतातील इतर राज्यांप्रमाणेच एक राज्य आहे. बहुतेक काश्मीरी जनतेनेही या निर्णयाचे स्वागत केले आहे. हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे. काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे. हे त्रिवार सत्य आहे. काश्मीरचा काही भाग पाकिस्तानच्या ताब्यात आहे. काही दिवसांनी तो भारताचा हिस्सा असेल.नुकतेच परराष्ट्र मंत्र्यांनी या बाबतची घोषणा केली आहे. देशात मंदीचे वातावरण आहे. असे बोलले जाते. त्याबाबत काळजी करण्याचे काम नाही. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घेतलेल्या निर्णयामुळे अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ लवकरच दूर होईल. भारतीय नागरिकांनी भाजप सरकारच्या निर्णयांचे स्वागत केले असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येईल या बद्दल विरोधकांनाही खात्री आहे.
डेव्हिड रांझ यांनी बापट यांच्याशी झालेल्या चर्चेबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच भारतासारख्या वेगाने विकसित होणाऱ्या देशाच्या मदतीसाठी अमेरिकेचे नेहमीच सहकार्य राहील असे मत व्यक्त केले.