पुणे ता. १०:- महापुरामुळे कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यातील लोकांना अत्यंत कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे.तेथील जनतेला मदत देण्याचे आवाहन खासदार गिरीश बापट यांनी काल केले होते. त्यानुसार आजपासून मदतीचा ओघ सुरु झाला आहे. आजच्या पहिल्या टप्यात सुमारे 30 ते 35 टेम्पो भरून मदत विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांच्याकडे जमा करण्यात आली.
गेल्या पाच ते सहा दिवसांपासून या महापुरामुळे कोल्हापूर, सांगली आणि सातारा भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. यामुळे महाराष्ट्रावर मोठे संकट आले आहे. महापुरात अडकलेल्या लोकांची सर्वबाजूनी कोंडी होत आहे. त्यांचा संसार वाहून गेला आहे. सध्या त्यांना पिण्यासाठी पाणी नाही, पोटभरण्यासाठी खायला ही त्यांच्याकडे काही नाही. सरकारने पुरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. देशभरातून मदत मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये जमा होत आहे. अशावेळी या लोकांना मदत करणे आपले ही कर्तव्य आहे.
यासाठी मोठ्या प्रमाणावर मदत करावी असे आवाहन खासदार बापट यांनी केले होते. खासदार गिरीश बापट व लेफ्टनंट जनरल डॉ.डी.बी शेकटकर यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या कॅटलिस्ट फाउंडेशन आणि नगरसेवकांमार्फत ही मदत संकलीत करण्याचे संयोजन केलं जात आहे. काल विभागीय आयुक्तांशी झालेल्या चर्चेनुसार लोकांना पिण्याच्या पाण्याची व बिस्किटे, चिवडा, लाडू, यासारखे कोरडे पदार्थ, औषधे यांची जास्त आवश्यता होती त्यानुसार आज मदत देण्यात आली. या भागातील पाऊस कमी झाला काही प्रमाणात पुराचे पाणी कमी झाले आहे.तरीही लोकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.लोकांना कपडे, ब्लँकेट, सतरंजी, भांडी यांची आवश्यकता आहे. याप्रमाणे कार्यकर्त्यानी जमा करण्याचे आवाहन खासदार बापट यांनी आज केले.
यावेळी महापौर मुक्ता टिळक, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, कॅटलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील माने, नगरसेवक राजेश येनपुरे,उमेश गायकवाड, सुशील मेंगडे,दीपक पोटे, ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, आरती कोंढरे, अजय खेडेकर, सम्राट थोरात, मनिषा लडकत यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
पूरग्रस्त भागातील लोकांसाठी सर्वबाजूनी मदत येत असताना पुणे महानगर पालिकेचे नगरसेवक ही यात मागे नाहीत. आज महापौर मुक्ता टिळक यांनी नगरसेवकांचे एक महिन्याचे मानधन पुरग्रस्तांसाठी देत असल्याची घोषणा केली.