गीतरामायण हा जीवनमुल्यांचा खजिना – गिरीश बापट
गीतरामायणामध्ये जीवनमूल्य आणि संस्काराचे मार्गदर्शन मिळते. भारताचा हा फार मोठा सांस्कृतिक खजिना आहे. असे मत राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी मेरठ येथे गीतरामायणाच्या कार्यक्रमप्रसंगी काढले.
बुधवारी रात्री मेरठ येथील चौधरी चरणसिंह विद्यापीठाच्या नेताजी सुभाषचंद्र बोस सभागृहात गीतरामायणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यावेळी बापट बोलत होते. याप्रसंगी उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, उत्तर प्रदेशचे आरोग्य मंत्री डॉ. सिध्दार्थनाथ सिंह, मेरठ महानगर पालिकेच्या महापौर सुनिता वर्मा, खासदार राजेंद्र अग्रवाल, छत्रपती संभाजी राजे, विद्यापीठाचे कुलगुरू नरेंद्रकुमार आदी मंचावर उपस्थित होते.
बापट म्हणाले, ग.दि. माडगूळकर आणि सुधीर फड़के यांची गीत रामायण ही रचना आदर्श जीवन जगण्याचे मार्गदर्शन करते. वाल्मिकी रामायणानंतर सर्वाधिक लोकप्रिय झालेली रचना ही गीतरामायण आहे. गीतरामायणाचा हिंदी, बंगाली, इंगजी, गुजराती, कन्नड, कोकणी, सिंधी आणि तेलगु भाषेत भावानुवाद झालेला आहे. ही रचना ग.दि. माडगुळकरांनी लिहिली असून सुधीर फड़के यांनी संगीतबद्ध केले आहे. यामधे रामायण या महाकाव्याच्या प्रसगांवर ५६ गीतांचा संग्रह आहे, अशी माहिती बापट यांनी दिली.
महाराष्ट्र शासन आणि उत्तर प्रदेश शासन यांच्यामधे सांस्कृतिक करार झालेला आहे. त्यानिमित्त गीतरामायणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.