समुपदेशकांचे आवाहन; आत्महत्या प्रतिबंधासाठी ‘कनेक्टिंग’ची हेल्पलाइन
पुणे : काही दिवसांपूर्वीची सांगलीच्या म्हैसाळ इथली सामूहिक-कौटुंबिक आत्महत्येची घटना असो की, एका लहान मुलाने मोबाईलवर बघून गळफास लावल्याची घटना असो, अशा घटनांनी आपण विषण्ण होते. ‘आत्महत्या’ हा शब्द कानावर पडला, तरी प्रत्येक मानवी मन अस्वस्थ होते. त्यामुळे आपण कितीही तणावाखाली असलो, तरी टोकाचे पाऊल उचलता कामा नये. मनावरील ताण हलका करण्यासाठी व्यक्त व्हा, असे आवाहन समुपदेशकांनी केले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून आत्महत्या प्रतिबंधासाठी कार्यरत असलेल्या कनेक्टिंग हेल्पलाइनच्या समुपदेशक शिल्पा तांबे, वीरेन राजपूत आणि बींटी मेहता यांनी सांगलीतील या सामूहिक आत्महत्येच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर टोकाचे पाऊल न उचलण्याचे आवाहन केले आहे. व्यक्त होण्यासाठी कनेक्टिंगच्या मोफत हेल्पलाईनवरील ९९२२००११२२ किंवा ९९२२००४३०५ या संपर्कावर किंवा distressmailsconnecting@gmail.com वर ईमेल पाठवू शकता. ही हेल्पलाइन रोज दुपारी १२ ते रात्री ८ पर्यंत चालू असते.
याविषयी शिल्पा तांबे म्हणाल्या, प्रचंड मानसिक भावनिक ताणामध्ये असलेल्या व्यक्तीची सर्वात मोठी गरज असते, ती त्यांना कोणीतरी ऐकून, समजून घेण्याची. ‘आत्महत्याग्रस्त व्यक्ती मानसिक दृष्ट्या दुर्बल असते’ किंवा आपण एखाद्याशी ‘तुझ्या मनात आत्महत्येचे विचार येतात का? असा थेट प्रश्न करणे म्हणजे त्याच्या मनात आत्महत्येचे विचार पेरणे होय’. अश्या असंख्य गैरसमजुतींनी समाजाला घेरले आहे, कनेक्टिंगमध्ये ‘ऐकून घेणे’ यावर भर दिला जातो. आपण आमच्याशी जे काही बोलाल ते सर्व गोपनीय ठेवले जाते, शिवाय आमच्याकडून कोणताही सल्ला दिला जात नाही, की आपल्या विषयी, आपल्या अनुभवाविषयी कोणतंही मत, धारणा बनवली जात नाही. आपल्याला आणि आपल्या वेदना समजून घेण्याचा व आपल्याला मानसिक आणि भावनिक आधार देण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करतो.”
वीरेन राजपूत म्हणाले, “ज्येष्ठांच्या मानसिक आणि भावनिक आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलिसांकडून ‘भरोसा सेल’द्वारे ज्येष्ठ नागरिकांना मदत पुरवली जाते. ज्येष्ठ नागरिकांनी नोंदणी केल्यास जवळचे पोलीस स्टेशन त्यांची नियमीतपणे विचारपूस करते आणि त्यांना काही हवे नको तेही पहाते. जागोजागी ‘ज्येष्ठ नागरिक संघ’ व ‘विरंगुळा केंद्रही’ आहेत, ज्यांचीही मदत घेता येवू शकते. बोलायला जागा न मिळाल्याने हताश व्यक्तीचा कोंडमारा होतो. तर ते असमाधान न समजल्यामुळे मदत करायची इच्छा असूनही लोक हतबलपणे मागे सरतात. ज्येष्ठांची निराशा पराकोटीला जाते व ते आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलायला प्रवृत्त होतात, असे ‘कनेक्टिंग’ संस्थेत काम करत असताना मला जाणवते. निराश अवस्थेतल्या व्यक्तीसाठी मदतीचा हात पुढे करणे वा त्यांना संवेदनशीलपणे ऐकणारा प्रशिक्षित कान उपलब्ध करून देणे हा ज्येष्ठांच्या आत्महत्या रोखण्याचा एक उपाय असू शकतो. ‘कनेक्टिंग’ संस्था त्याचसाठी सतत काम करते.”
आत्महत्येच्या प्रयत्नातून वाचलेल्या व्यक्तींना किंवा आत्महत्या घडल्यानंतर मागे राहिलेल्या कुटुंबियांना त्यांच्या वेदनांबद्दल, त्या अनुभवाबद्दल बोलायचे असल्यास आमची दुसरी सेवा ‘सुसाईड सर्व्हायव्हर सपोर्ट’हेल्पलाईन उपलब्ध आहे. ही सेवा दर बुधवार, शुक्रवार, शनिवारी दुपारी ३.१५ ते सायं ५.१५ कार्यरत असते. आपण ८४८४०३३३१२ या नंबरवर एसएमएस द्वारे किंवा मिस्ड कॉल देऊन मदत घेता येईल, असे बिंटी मेहता यांनी सांगितले.