पुणे, -तूरडाळ घोटाळा आणि त्याबाबत न्यायालयाने दिलेला आदेश यामुळे भ्रष्टाचारी बापट यांचा चेहरा
उघड झाल्याचे सांगून’पुणे लोकसभा मतदारसंघातील निवडणूक ही’धनशक्ती’विरुद्ध’जनशक्ती’ अशी
आहे. गेल्या वीस दिवसाच्या निवडणूक प्रचारात काँग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्र पक्ष आघाडीचे नेते व
कार्यकर्त्यांनी दाखविलेली एकजूट तसेच सर्वत्र जनतेचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेता
परिवर्तनाची चाहूल लागली असून त्यामुळे माझा या निवडणुकीत विजय निश्चित आहे, पुण्याची ही
निवडणूक आता कॉंग्रेसच्या हातात आली आहे. असा विश्वास पुणे लोकसभा मतदार संघातील काँग्रेस-
राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी रविवारी काँग्रेस भवनात पत्रकार
परिषदेत बोलताना व्यक्त केला.
या पत्रकारपरिषदेला शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, राष्ट्रवादी शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन
तुपे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार वंदना चव्हाण, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, पी ए
इनामदार, आमदार शरद रणपिसे, माजी आमदार कमल ढोले-पाटील, माजी आमदार दीप्ती चवधरी,
राष्ट्रवादी काँगेसचे प्रवक्ते अंकुश काकडे, कॉंग्रेसचे नेते प्रवीण गायकवाड, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस
अभय छाजेड, अरविंद शिंदे, कमल व्यवहारे, आबा बागुल, संजय बालगुडे, सदानंद शेट्टी, सुजाता शेट्टी, रवींद्र
धंगेकर, राजेंद्र कुंजीर, नीता रजपूत, डॉ. सतीश देसाई, काका धर्मावत , शानी नौशाद, रमेश
अय्यर, दत्ता एकबोटे, बुवा नलवडे, जयसिंग भोसले, प्रकाश भालेराव , महेश शिंदे, राहुल डंबाळे, योगेश पांडे, शुभम
सोनवणे, बबनराव अडसूळ. आदी उपस्थित होते. प्रारंभी रमेश बागवे यांनी प्रास्ताविक केले.
काँग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी म्हणाले, प्रचारादरम्यान मी जेथे जेथे गेलो तेथे मला
नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला विशेषतः तरुण वर्गाचाही अनुकूल प्रतिसाद मिळाल्यामुळे
परिवर्तनाची चाहूल लागल्याचे प्रत्यंतर आले. बाबा आढाव यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी देखील यावेळी
प्रथमच उघड भूमिका घेऊन काँगेस आघाडीला मतदान करण्याचे आवाहन केले. तर पुण्यातील असंख्य
नागरिकांनी भाजप हा रामभाऊ म्हाळगी, अडवाणी यांच्या काळातील राहिला नसल्याने आपण यावेळी
भ्रष्टाचारी उमेदवार दिलेल्या भाजपला मतदान करणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे पुण्यात पुन्हा एकदा
काँगेस आघाडीचा उमेदवार निवडून येईल आणि पुण्याला कार्यक्षम खासदार देण्याची काँग्रेसची परंपरा
पुन्हा प्रस्थापित होईल असे त्यांनी सांगतले.
पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांच्याबद्दल बोलताना मोहन जोशी
म्हणाले, पुण्याचे यापूर्वीचे भाजपचे खासदार अनिल शिरोळे अकार्यक्षम असल्याने त्यांना उमेदवारी
नाकारण्यात आली आणि पालकमंत्री असलेले गिरीश बापट यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र पालकमंत्री
म्हणून बापट यांनी पुणे शहराच्या विकासासाठी काय केले? असाच प्रश्न नागरिक विचारीत होते. बापट
यांनी पाच वर्षात पुण्याच्या विकासासाठी एकही प्रकल्प आणला नाही उलट काही प्रकल्प पुण्याबाहेर गेले.
बापट यांच्या निष्क्रियतेमुळे पुण्याची पाणीपुरवठा स्थिती गंभीर झाली तर वाहतूक व्यवस्था पूर्णपणे
कोलमडली. विरोधी पक्षात असताना हेल्मेटसक्तीला विरोध करणारे बापट सत्ता मिळताचं लगेच बदलले
आणि त्यांच्या हेल्मेटसक्तीच्या अट्टाहासामुळे कोट्यवधींची दंड वसुली झाली. मात्र या ‘जिझिया करा’; मुळे
जनतेमध्ये वाढती नाराजी आहे. यापूर्वीच्या काँग्रेस सरकारने एकाचवेळी पुणे आणि नागपूर येथे मेट्रो
प्रकल्पाची घोषणा केली होती. नागपूरचा मेट्रो-प्रकल्प मार्गी लागला मात्र पुण्यात अजूनही फक्त अर्धवट
खांब उभे असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पाचे पंतप्रधानांनी मोठ्या गाजावाजात
उदघाटन केले मात्र फक्त तीनशे कोटीचे अनुदान मिळाल्यामुळे अनेक कामे रखडली. पुण्यातील रस्ते अरुंद
झाल्यामुळे वाहतूक कोंडीत भरच पडत आहे असे ते म्हणाले.
तूरडाळ घोटाळा आणि त्याबाबत न्यायालयाने दिलेला आदेश यामुळे भ्रष्टाचारी बापट यांचा चेहरा
उघड झाल्याचे सांगून मोहन जोशी म्हणाले, ‘गुटखा-बंदी’असूनही पुणे परिसरात त्यांच्या आशीर्वादाने
निर्वेधपणे गुटखा विक्री चालू आहे.
पुण्याचा सर्वांगीण विकास फक्त काँग्रेसच्याच राजवटीत झाला असा दावा करून मोहन जोशी
म्हणाले, मधल्या काळात भाजपच्या राजवटीत हा विकास खुंटला होता. त्यामुळे भावी खासदार म्हणून
माझ्यावर मोठी जबाबदारी आली आहे. वेगाने वाढणाऱ्या पुण्याच्या विकासा साठी केंद्राकडून स्पेशल पॅकेज
मंजूर करून घेणे तसेच पुण्यात राहणाऱ्या असंख्य निवृत्त सनदी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेऊन पुण्याच्या
विकास कार्यान्वित करणे हे माझे भावी काळातील प्रमुख उद्दिष्ट राहील असे त्यांनी यावेळी सांगितले.
‘पुण्यातील पारंपरिक गणेशोत्सव आणि पालखी महोत्सव साजरा करताना पालकमंत्री म्हणून बापट
यांनी अडथळेच आणले. गणेशोत्सवकाळात कार्यकर्त्यांविरुद्ध भरण्यात आलेले खटलेही त्यांनी मागे घेतले
नाहीत. काही वर्षांपूर्वी मी आमदार असताना गणेशोत्सवकाळात कार्यकर्त्यांविरुद्ध भरण्यात आलेले खटले
मागे घेण्यासाठी खास प्रयत्न केले होते. आता मी खासदार म्हणून हे काम करणार आहे असेही त्यांनी
सांगितले.