पुणे-पुण्यात चार दशके राजकीय क्षेत्रात काम करताना गिरीश बापट यांना पूर्ण पाच वर्ष पालकमंत्री
पदाची संधी मिळाली होती या आधारावर ते पुण्याचा भरीव विकास करतील अशी अपेक्षा होती.
पण ही अपेक्षा पूर्ण फोल ठरली असून बापटांनी पालकमंत्री पदाची ही संधी वाया घालवली आहे
अशी टीका काँग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्रपक्षांच्या आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी केली.
आज वडगाव शेरी विधानसभा मतदार संघातील भव्य प्रचार फेरीनंतर ते बोलत होते. ते म्हणाले
की, बापट साहेबांनी पुण्याचे मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष केले. काल बापट साहेब मार्केट यार्ड
परिसरात गेले होते तेथील समस्यांकडे आपण लक्ष देऊ असे आश्वासन त्यांनी तेथे दिले, पण
गेल्या पाच वर्षात त्यांना तेथील एकही समस्या का सोडवता आली नाही हा मुख्य प्रश्न आहे.
पुणे शहराच्या सर्वच भागात भाजप आणि बापट यांच्या विषयी हाच प्रश्न आहे. मेट्रो मार्गी
लावली म्हणून प्रत्येक सभेत ते पाठ थोपटून घेत असले तरी पुण्याच्या मेट्रोला भाजप सरकारने
तीन वर्षे उशीर लावला त्यामुळे या प्रकल्पाचा खर्च किमान अडीच ते तीन हजार कोटींनी वाढला.
भाजपच्या या बेफिकिरीचा बोजा पुणेकरांनाच सोसावा लागणार आहे. पूर्ण एकहाती सत्ता
असतानाही भाजप पुण्यात काहीच करू न शकल्याने या पक्षाविषयी लोकांमध्ये कमालीचे नैराश्य
आहे त्याची प्रचिती या निवडणुकीत निश्चित दिसून येईल असेही जोशी म्हणाले.या रॅली मध्ये अ.
भा. कॉंग्रेस पक्षाच्या चिटणीस व महाराष्ट्राच्या सहप्रभारी सोनल पटेल या देखील सहभागी झाल्या
होत्या.
आज वडगाव शेरी विधानसभा मतदार संघातील प्रचार रॅलीची सुरवात शेकडो कार्यकर्त्यांच्या
समवेत शिवाजी पुतळा येथून झाली. प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार
अर्पण करून या रॅली चा प्रारंभ झाला.
उमेदवार मोहन जोशी यांच्याशी हस्तांदोलन करून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी जमलेल्या
नागरिकांची गर्दी होती. ही रॅली चंदन नगर – खराडी – खराडी गाव –आपले घर –
बायपास चौक – खुळेवाडी – पाण्याची टाकी – सोमनाथ नगर – गणेश नगर – साईनाथ नगर –
वडगावशेरी – कल्याणी नगर – नगर रोड – साईबाबा मंदिर येथे समाप्त झाली.
माजी आमदार बापूसाहेब पठारे, सुनील टिंगरे, सुमन पठारे, भय्यासाहेब जाधव , महेंद्र पठारे,नारायण
गलांडे, सुनील मलके, महादेव पठारे, संगीता देवकर, राजेंद्र शिरसाठ, राहुल शिरसाठ, उषा गलांडे,
संतोष गलांडे, राजेंद्र खांदवे, अरुण वाघमारे, रमेश सकट, विनय माळी, जितेंद्र गुप्ता, अॅड. रोकडे, बाबा
नायडू, शिवानी माने, विशाल मलके, सुनिता भोसले, विजय साबळे, मुकुंद गलांडे, रवींद्र गलांडे, भीमराव
गलांडे, यांसह कॉंग्रेस – राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्रपक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
कॉंग्रेस – राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांचा एकत्रित प्रचार करण्यासाठी
कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे सर्व माजी महापौर, माजी उपमहापौर, माजी स्थायी समिती अध्यक्ष, माजी शिक्षण
मंडळ अध्यक्ष, माजी पीएमटी अध्यक्ष यांचा एकत्रित मेळावा, राष्ट्रवादी कॉंग्रेस जेष्ठ नेते व माजी
उपमहापौर उल्हास ढोले पाटील यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला. यामध्ये मोहन जोशी यांना
मोठ्या बहुमताने निवडून आणण्याचा निर्धार केला गेला. तसेच गुरुवार दिनांक १७ एप्रिल रोजी सकाळी
९.०० वाजता लोकमान्य टिळक पुतळा महात्मा फुले मांडई येथून हे सर्व माजी पदाधिकारी अलका टॉकीज
पर्यंत ‘भाजप हाटाओ- देश बजाव’ रॅली काढणार आहेत.