पुणे- पुण्यातून आपापल्या गावी ,घराकडे जाणाऱ्या माजुरांच्याबाब्त जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे ती लवकर पूर्ण करून त्यांना सुखरूप घरी जाऊ द्या ,त्यांच्या साठी रेल्वे तिकिटांचा खर्च आमचा पक्ष करणार आहे . सोनिया गांधी, बाळासाहेब थोरात यांनी कळविले तर आहेच पण राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या व शहर कॉंग्रेसच्या पुढाकारातून खर्चाची सारी प्रक्रिया आम्ही तातडीने पार पाडू तुम्ही फक्त मजुरांची नावे, पत्ते, रेल्वे तिकिटांचा तपशील द्या म्हणजे आम्हालाही खर्च जमा करायला बरे … अशा शब्दात शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना तातडीचे साकडे घातले .
माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यावेळी बागवे यांच्या समवेत उपस्थित होते. बागवे म्हणाले हे सारे तळागाळतळे मजूर आहेत . सुमारे दीड महिना त्यांनी काम नसताना अंगावर काढला आहे. कधी मदत झाली कधी नाही झाली . अशा अवस्थेत आता घरी परतण्यासाठी त्यांच्याकडून रेल्वे तिकिटांचे पैसे तर घेऊ नयेत पण घेणारच असाल तर आम्ही ते देऊ अशी घोषणा सोनिया गांधी यांनी केली आहे. श्रीमंत लोकांना आपण परदेशातून विमानाने भारतात आणले . मजुरांना कशाला खर्चात पाडायचे? केंद्र सरकारने याबाबत काहीही आस्था दाखविली नाही म्हणून कॉंग्रेसने पुढाकार घेऊन हि तयारी केली आहे. या प्रक्रियेस प्रारंभ करायचा म्हणून जिल्हाधिकारी यांच्याकडे रेल्वे आणि जाणाऱ्या मजुरांच्या तिकिटाच्या खर्चाच्या तपशिलाची मागणी केली आहे