आजचा भारत राजीव गांधींच्या दूरदृष्टीचा परिपाक-अनंत बागाईतकर
पुणे : “स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी यांनी अतिशय अल्प काळात धडाडीचे निर्णय घेतले. त्यामध्ये माहिती तंत्रज्ञान, जागतिकीकरण, आर्थिक उदारीकरण, संरक्षण क्षेत्रावरील भर, शेजारील देशांशी संबंध आदी गोष्टींचा समावेश आहे. त्यांनी स्वप्न पाहिली आणि कोणत्याही प्रकारची तडतोड न करता कठोर निर्णय घेत त्याची पूर्तता करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच आज माहिती तंत्रज्ञान, ऑटोमोबाईल क्षेत्राचा विकास झाला आहे. त्यांच्या दूरदृष्टीचा परिपाक आहे,” असे मत ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक अनंत बागाईतकर यांनी व्यक्त केले. ‘राजीव गांधी यांची प्रासंगिकता’ या विषयावरील व्याख्यानात अनंत बागाईतकर बोलत होते.
राजीव गांधी स्मारक समिती, मिशन राजीव, पुणे शहर काँग्रेस व तिवारी मित्र परिवाराच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन सभा व व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांचेही ‘राजीव गांधी – जोखीम घेणारा पंतप्रधान’ या विषयावर व्याख्यान झाले. राज्याचे माजी मंत्री आणि अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य बाळासाहेब थोरात या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. नवी पेठेतील पत्रकारभवनाच्या कमिन्स सभागृहात झालेल्या या कार्यक्रमावेळी पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, ज्येष्ठ नेते उल्हास पवार, मोहन जोशी, माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, संयोजक गोपाळ तिवारी आदी उपस्थित होते.
अनंत बागाईतकर म्हणाले, “राजीव गांधी यांच्याकडे काम करण्याची क्षमता व मनाचा चांगुलपणा होता. ४१५ जागांचे राक्षसी बहुमत असतानाही त्यांनी कधीच विरोधकांचा तिरस्कार केला नाही. याउलट संवादी भूमिका घेत देशाच्या विकासाच्या दृष्टीने धोरणी आखली व राबवली. लोकशाहीचे मूल्य जपताना शिक्षण मंत्रालयाचे मनुष्यबळ विकास मंत्रालय, संरक्षण दलातील महत्वाचे बदल, माहिती तंत्रज्ञानाचा वापर, ऑटोमोबाईलला प्रोत्साहन, विविध राज्यांतील चळवळींच्या भावना समजून घेत त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न अशा अनेक गोष्टी राजीव गांधी यांनी केल्या. गेल्या चार-पाच वर्षात मात्र, चळवळी आणि विरोधी विचारणा ठेचण्याचे काम होत आहे. भाजप आणि संघाचे लोकही राजीव गांधी यांच्या अनेक निर्णयाचे कौतुक करत असत. हीच त्यांच्या कामाची पोचपावती होती.”
हेमंत देसाई म्हणाले, “सध्याचे सरकार लोकशाही संकुचित करत आहे. राजीव गांधी यांनी नेहमी दोन विचार असावेत, या भूमिकेला प्रोत्साहन दिले. त्यांच्यावर अश्लाघ्य शब्दांत टीका करणारे सध्याचे दोन नटसम्राट, बनिया केवळ द्वेषाचे राजकारण करीत आहेत. मतांचे ध्रुवीकरण आणि सौदे करण्यासाठी कोणत्याही अविवेकी भूमिकेतून काम करण्यावर त्यांचा भर आहे. राजीव गांधींनी ३० वर्षांपूर्वी जे काम करून ठेवले त्याची फळे आपण आज चाखत आहोत. पारदर्शक म्हणजे नेमके काय याचे उदाहरण त्यांनी घालून दिले होते. शेजारील देशांशी आणि देशातील राज्यांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्यात त्यांची भूमिका मोलाची होती. शपथ घेतल्यानंतर पहिल्या वर्षात त्यांनी धडाधड घेतलेल्या निर्णयांमुळे देश प्रगतीपथावर नेला. आज काही लोक काँग्रेस संपवण्याची भाषा करताहेत. मात्र, काँग्रेस हा विचार असून, तो कधीही संपणार नाही.”
बाळासाहेब थोरात म्हणाले, “देशाला तंत्रज्ञान देण्यात राजीवजींचे योगदान मोठे आहे. पुण्यात असलेले सीडॅक त्यांच्याच प्रयत्नातून उभे राहिले. तंत्रज्ञानासह आर्थिक, व्यापारी आणि शेती क्षेत्रावरही त्यांनी भर दिला होता. त्याबाबतीत अनेक चांगले निर्णय त्यांनी घेतले. माणूस म्हणून त्यांनी एक वेगळा ठसा उमटवला होता. आजच्या द्वेषाच्या राजकारणात लोकशाही पुढे न्यायची असेल आणि देशाचा विकास व्हायचा असेल, तर राजीव गांधी यांच्या विचारांवर आपण चालले पाहिजे. त्यासाठी त्यांच्या कार्याचा, विचारांचा प्रचार व प्रसार आपण करायला हवा.”
गोपाळ तिवारी यांनी प्रास्ताविक केले. हनुमंत पवार यांनी सूत्रसंचालन केले. अविनाश गोडबोले यांनी आभार मानले.