पुणे, बारामती, शिरुर व मावळ लोकसभा मतदारसंघातील मतदानाविषयी
मुख्यमंत्री फडणवीस व खासदार काकडे यांच्यात सविस्तर चर्चा
पुणे-: लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या लाटेत काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांचा संपूर्ण देशभरात सुपडासाफ झाला आणि भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला तब्बल 352 जागा मिळाल्या. महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 41 जागा जिंकून भाजपा व शिवसेना महायुतीने मोठा विजय संपादित केला. महाराष्ट्रातील या विजयात मोदी यांच्या करिश्म्याबरोबरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नियोजनपूर्वक कामाचा सिंहाचा वाटा आहे. देशात व राज्यात मिळालेल्या निर्भेळ यशाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन भाजपाचे सहयोगी सदस्य व राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी आज त्यांचे विशेष अभिनंदन केले. यावेळी दोघांमध्ये पुणे, बारामती, शिरुर व मावळ या चार लोकसभा मतदार संघात महायुतीच्या उमेदवारांना विधानसभा मतदार संघनिहाय झालेल्या मतदानाबद्दल सविस्तर चर्चादेखील झाली.
लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर आज खासदार संजय काकडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळी पुणे, बारामती, शिरूर व मावळ या चार लोकसभा मतदार संघात भाजपा-शिवसेना महायुतीच्या उमेदवारांना मिळालेल्या मतदानाबद्दल दोघांमध्ये सविस्तर चर्चा झाली. चार लोकसभा मतदार संघातील एकूण 24 विधानसभा मतदार संघापैकी 15 विधानसभा मतदार संघात महायुतीच्या उमेदवारांना आघाडी मिळाली आहे तर, 9 विधानसभा मतदार संघात महायुतीच्या उमेदवारांना कमी मतदान झाले. यामध्ये पुणे शहर लोकसभेतील वडगावशेरी, शिवाजीनगर, कसबा, कोथरुड, पर्वती व पुणे कॅन्टोन्मेंट या सहाही मतदार संघात महायुतीच्या उमेदवाराला आघाडी मिळाली असून, बारामतीमधील खडकवासला व दौंड आणि शिरुर लोकसभेतील भोसरी व हडपसर विधानसभामध्ये महायुतीला मताधिक्य मिळाले आहे. मावळ लोकसभा मतदार संघात पिंपरी, चिंचवड, मावळ, उरण व पनवेल या पाच विधानसभा मतदार संघात मताधिक्य मिळाले असून कर्जत विधानसभेमध्ये कमी मते मिळाली आहेत. बारामती लोकसभेतील बारामती, इंदापूर, पुरंदर व भोर विधानसभा आणि शिरुर लोकसभेतील जुन्नर, आंबेगाव, खेड व शिरुर विधानसभेत महायुतीला कमी मतदान झाले आहे. या सर्व मतदार संघातील आकडेवारीसह आणि त्याठिकाणी कराव्या लागणाऱ्या कामासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस व खासदार काकडे यांच्यात सविस्तर चर्चा झाली. दरम्यान, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचेही जालना लोकसभेतील विजयाबद्दल खासदार काकडे यांनी अभिनंदन केले.
महाराष्ट्रात शिवसेनेबरोबर युती करण्यापासून ते उमेदवार निश्चिती आणि प्रचाराचे नियोजन करण्यापर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष मेहनत घेतली. त्यांनी प्रत्येक मतदार संघाबाबतीत सुक्ष्म नियोजन केले आणि त्यामुळेच कधी काळी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातही भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार विजयी झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निश्चितच करिश्मा आहे. परंतु, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रातील सरकारने केलेल्या कामाला व निवडणूक काळात केलेल्या प्रचाराच्या नियोजनाला नजरेआड करता येणार नसल्याचे खासदार संजय काकडे यांनी म्हटले आहे.