पुणे-सरकारी/सरकारी अनुदानित शाळांमध्ये पायाभूत सुविधा, सोई, आणि शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी 07 सप्टेंबर 21 रोजी सुरू करण्यात आलेल्या विद्यांजली योजनेअंतर्गत निर्धारित केलेल्या उद्दिष्टाच्या अनुषंगाने,भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडने दक्षिण भारतातील निवडक शाळांबरोबर एक व्यापक सहकार्य कार्यक्रम सुरू केला आहे.
भारताच्या स्वातंत्र्याला 75वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ या उत्सवाच्याअंतर्गत , 75 सरकारी/सरकारी अनुदानित शाळांची निवड करण्यात आली, या शाळांमध्ये 06 जानेवारी 23 रोजी विविध उपक्रम राबवण्यात आले.30 आर्मी पब्लिक स्कूल्सच्या विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी या शाळांमध्ये जाऊन पुस्तके, लेखन साहित्य , वाचन साहित्य यांची तरदूत केली तसेच लष्करी डॉक्टरांचे वैद्यकीय शिबिर, योगाभ्यासाचे आयोजन, शारीरिक शिक्षण वर्ग, क्रीडा स्पर्धा इत्यादी विविध उपक्रम राबवले गेले.
पुण्यात, घोरपडी गावातील कन्टोन्मेंट बोर्डाच्यामाध्यमिक शाळेची विद्यांजली योजनेंतर्गत निवड करण्यात आली होती. या शाळेच्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांशी समन्वय करण्यासाठी आर्मी पब्लिक स्कुल (एपीएस) पुणे या शाळेला नामांकित करण्यात आले होते.या शाळेत आयोजित कार्यक्रमात दक्षिण मुख्यालयाचे चीफ ऑफ स्टाफ लेफ्टनंट जनरल मनजीत कुमार उपस्थित होते.यावेळी बोलताना चीफ ऑफ स्टाफ यांनी , शाळेने मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी केलेल्या कौतुकास्पद कार्याची प्रशंसा केली आणि आर्मी पब्लिक स्कुल, पुणे यांच्या सहकार्याद्वारे शिक्षणाच्या गुणवत्तेत आणखी सुधारणा होईल आणि शाळेत अतिरिक्त सोयी आणि सुविधा निर्माण करणे सुलभ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
15 जानेवारी 23 रोजी बंगळुरू येथे दक्षिण भारतात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या लष्कर दिन संचलन बद्दल जागरुकता वाढविण्यासाठी देखील या कार्यक्रमाचा उपयोग करण्यात आला.विद्यांजली योजनेचा एक भाग म्हणून 06 जानेवारी 23 रोजी आयोजित केलेली मोहीम वर्षभर सुरू राहणार आहे.आणि यामुळे निवडलेल्या शाळांचे शिक्षण, पायाभूत सुविधा आणि सुविधांच्या गुणवत्तेला चालना देण्यासाठी मदत होईल आणि देश उभारणीसाठी भारतीय लष्कराची वचनबद्धता ही मोहीम प्रदर्शित करेल.