दि. ५ मे रोजी उद्योजक डॉ. मिलिंद कांबळे यांना विशेष पुरस्कार
पुणे – छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृतीशताब्दी वर्षाचा प्रारंभ, शुक्रवार दि. ६ मे २०२२ पासून होत असून, त्याच्या पूर्वसंध्येला पुण्यात गुरुवार दि. ५ मे रोजी सायं. ५.३० वाजता, पत्रकार भवन हॉल (पहिला मजला) येथे आयोजित विशेष कार्यक्रमात दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मिलिंद कांबळे यांना विशेष पुरस्काराने गौरवले जाणार आहे.
सावित्री बाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू मा. नितीन करमळकर यांच्या अध्यक्षते खाली हा समारंभ होईल. पगडी, मानपत्र, शाल व पुस्तक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. संवाद पुणे आणि समर्थ युवा फौंडेशन यांच्या संयुक्तविद्यमाने याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन व समर्थ युवा फौंडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे यांनी सांगितली.
छत्रपती राजर्षी शाहू महाराज (जून २६, इ.स. १८७४ – मे ६, इ.स. १९२२) कोल्हापूर संस्थांचे छत्रपती व थोर समाजसुधारक होते. ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी या काळामध्ये शाहू राजांनी प्रयत्न केले. सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली. त्यांनी दलित व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळेच यंदा दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मिलिंद कांबळे यांना छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी वर्ष प्रारंभ निमित्त गौरविले जाणार आहे असे सुनील महाजन व राजेश पांडे म्हणाले.
डॉ. मिलिंद कांबळे हे सिव्हील इंजिनियर व उद्योजक असून, दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजची स्थापना २००५ मध्ये त्यांनी पुण्यात केली. ते संस्थापक अध्यक्ष आहेत. सन २०१३ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित होऊन दलित समाजातील तरुणांना उद्योजक होण्यासाठी प्रेरणा देऊन त्यांची व समाजाची आर्थिक उन्नती व्हावी यासाठी ते प्रयत्न करतात. त्यांच्या प्रयत्नांमुळे संस्थेचा कारभार देशातील सर्व २९ राज्ये व ७ परदेशांमध्ये पसरला आहे.