पुणे-‘नको व्हीलचेयर नको कुबड्या’, हे बोधवाक्य असलेल्या पुण्यातील कृत्रिम अवयव केंद्राची सात दशकांची अभिमानास्पद वाटचाल आहे, 1944 मध्ये स्थापन झाल्यापासून, हे केंद्र भारतीय सैन्याच्या शूर सैनिकांना, जे चकमकींत आपले हात – पाय गमावतात त्यांना कृत्रिम हात – पाय, उपकरणे आणि पुनर्वसन सुश्रुषा देण्यात सक्रीय आहे. या केंद्रात अपंगांसाठी कृत्रिम अवयव आणि ऑर्थोटिक असे पुनर्वासनाधारित सर्वंकष उपचार देण्यात येतात.
स्थापना झाल्यापासून इथे 60,000 पेक्षा जास्त रुग्णांवर उचार करण्यात आले आहेत, असा हे केंद्र अभिमानाने दावा करू शकते. या केंद्रात शारीरिक अपंगत्व आलेल्या रुग्णांना सर्वोत्तम कृत्रिम अवयव आणि ऑर्थोटिक उपचार देण्यात येतात, जेणेकरून ‘प्रत्येक अपंगाचे स्वतःच्या पायावर चालण्याचे स्वप्न खरे करण्याचे’ ध्येय गाठता येईल.
या केंद्राच्या ग्राहकांमध्ये सशस्त्र सैन्य दलांचे कर्मचारी, सेवानिवृत्त लष्करी कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय आहेत. सीमा सुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलीस दल, आसाम रायफल्स, इंडो तिबेटीयन सीमा पोलीस यासारख्या निमलष्करी दलातील आणि नागरी रुग्णांना देखील आवश्यक ते कृत्रिम आणि ऑर्थोटिक उपचार पुरविण्यात येतात, मात्र त्यासाठी शुल्क आकारले जाते. नेपाळ, भूतान, अफगाणिस्तान, बांगलादेश वगैरे शेजारी देशांतील रुग्णांची देखील या केंद्रात पुनर्वसन आणि शुश्रुषा दिली जाते.
अपंग पुनर्वसन केंद्राच्या संकल्पनेत, अनेक व्यापक उपक्रम समाविष्ट करण्यात आले आहेत. यात असेही उपक्रम आहेत, ज्यात, अपंगत्व आणि त्याचे अपंग व्यक्तीवर होणारे, भावनिक, मानसिक तसेच सामाजिक स्तरावरचे तात्कालिक आणि दूरगामी असे दोन्ही परिणाम विचारात घेऊन, त्यावर उपाययोजना करणारे उपक्रमही आहेत. या केंद्रात ‘करुणामय मनाने काळजी घ्या’ या तत्वाला सर्वाधिक महत्त्व दिले जाते. खासकरुन, अपंग पुनर्वसन केंद्रात या सर्व गोष्टींना विशेष महत्त्व दिले जाते.
कृत्रिम अवयव केंद्र-एएलसी इथला बहुशाखीय अपंग पुनर्वसन चमू एकसंधतेने काम करतो, जेणेकरुन, अपंग व्यक्तीला, समाजाच्या मुख्य प्रवाहात, एक उत्पादकक्षम, स्वयंपूर्ण, आत्मविश्वास असलेली स्वतंत्र व्यक्ती म्हणून आपले स्थान निर्माण करता येईल.
हे केंद्र, लष्कराच्या खडकी येथील पॅरालिंपिक क्रीडा विभागाशी देखील जोडलेले आहे. तसेच, या केंद्रात अनेक अपंग पॅरालिंपिक खेळाडूंवर अत्याधुनिक शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्या आहेत. एएलसी पुणे मुळे अनेक ‘ब्लेड रनर्स’ खेळाडू भारतीय लष्कराचे, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पॅरालिंपिक स्पर्धांमध्ये प्रतिनिधित्व करु शकले आहेत, एवढेच नाही, तर त्यांनी भारतासाठी अनेक पदकेही जिंकली आहेत.
या केंद्रात अपंग व्यक्तींना सुगम ठरेल असा तरण तलाव आहे. त्याशिवाय ‘मल्टी स्टेशन जिम’, खेळाचे मैदान, बास्केटबॉल आणि व्हॉलीबॉलची मैदाने अशा सुविधा आहेत. या सर्व ठिकाणी अपंग जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीसाठी विविध क्रीडाप्रकारांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन आणि सुविधा दिल्या जातात.