पुणे-केंद्राकडून शेकडो कोटींचा निधी लाटून आणलेल्या बीआरटी ला ती येण्यापूर्वी पासूनच विरोध होता होता . रस्ते रुंद करा , वाहतूक सुरळीत करा असे सर्वांचेच म्हणणे होते , बीआरटी ने त्याच काळात माध्यमांची पानेच्या पाने रंगविली , अचाट सुंदरतेचे स्वप्न दाखविले प्रत्येक स्थानकावर फोन, वेळापत्रक, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था यासह बाजूचा खाजगी वाहनांसाठीचा रस्ता , सायकल मार्ग आणि विशेष म्हणजे प्रत्येक दुभाजकावर हिरवळ ,असे सुंदर चित्रे रंगवून दाखविली गेली ,पण या चित्रांत वाहने मात्र तुरळक दिसत होती .आणि सारे कसे एखाद्या देशातील सुंदर तैलचित्रा प्रमाणे होते .पण याच बीआरटी च्या प्रश्नावरून तत्कालीन महापालिकेतील सत्ता उलथवून पाडली गेली . बीआरटी आल्यावर ९ दिवसात तिचे कौतुक गायब झाले होते . आणि स्पष्ट जाणवू लागला भ्रष्ट कारभार.. … बी आर टी आणल्याने बीआरटी ची लेन तर झाली पण शहरात बहुसंख्य असलेल्या वाहनांची याच लेन ने कोंडी करून त्यांना जेरीस आणले . तेव्हा महापालिकेतील वाहतूक नियोजक यांचे वाक्य होते , हेच तर पाहिजे आपल्याला .. यांची कोंडी वाढली कि हेच लोक बीआरटी कडे आपसूक वळतील आणि शहरात खाजगी वाहने वापरण्याचा वेग आपोआप कमी होईल . सुरुवातीला या बीआरटीच्या लेन मधून एसटी ला हि बंदी होती , चुकून जरी घुसली तरी दंड होता. एकीकडे कोणीही वापरत नाही असा सायकल मार्ग बाजूला धूळ खात पडला होता , पोलीसही या मार्गावर येणाऱ्या खाजगी वाहन चालकांचे गळे धरत होते . आणि बीआरटी लेन मध्ये घुसणाऱ्या खाजगी वाहनांना हि पकडण्याची शर्यत लागली होती.चारही बाजूंनी खाजगी वाहनांची अशी कोंडी होत असतानाही आश्चर्य म्हणजे पुण्यातील खाजगी वाहनांच्या खरेदीत दिवसेंदिवस वाढच होत गेली. हे का होतेय ? याची जराही दाखल कोणाला घ्यावी का वाटली नाही . कारण तो प्रश्न अगदी सामान्य स्तरावरील आम माणसाचा प्रश्न होता . पुण्यात काम करायचे , नौकरी करायची तर स्वतःची दुचाकी हवीच हि अट खुद्द बीआरटी वर नाराज कशाला ? असा प्रश्न कायम उपस्थित करणाऱ्यांच्या कंपनीत देखील होतीच . वारंवार बाहेर ये जा कराव्या लागणाऱ्याना नौकरी , व्यवसायात खाजगी वाहन असणे अजूनही पुण्यात गरजेचे आहेच. बीआरटी आणि सार्वजनिक बस किंवा ऑटो वर अवलंबून राहून या पुण्यात कामधंदा करणे किंवा पोट भरणे निव्वळ अगदी ठराविक लोकांनाच शक्य होते तेच अजूनही याच सेवेचा वापर करत आहेत. पण त्यांनाही नंतर नंतर हि सेवा बाईक पेक्षाही महाग, किचकट वाटू लागते . एकीकडे लाखो लोक बीआरटी आणि बसने ने प्रवास करतात , बसेस तुडुंब भरून वाहतात असे चित्र असताना दुसरीकडे पीएमटी /पीएमपीएमएल सातत्याने तोट्यात जात होतीच . याच पुणेकरांकडून अन्य मार्गे कर वसूल करून जमा केलेली शेकडो कोटीची रक्कम हा तोटा भरून काढण्यासाठी पीएमटी/पीएमपीएमएल यांना देण्यात येत होती आणि अजूनही देण्यात येत आहे. अगदी हीच सेवा फुकट ठेवली तरीही तिचा खर्च लोकांच्याच पैशातून वसूल केला जाणार आहे .पण तरीही हि बस सेवा सर्वाना सोयीची होऊ शकेल काय ? हा प्रश्न बीआरटी वर नाराज कशाला? असा प्रश्न करणारांना विचारला गेला पाहिजे. बीआरटी ला तसा विरोध का होतो हेच हि मंडळी समजून घ्यायला तयार नाही हे खरे शल्य आहे. शहरात वाहने किती आहेत , खाजगी किती ? कोणत्या प्रकारची किती ? त्यांचा वापर का होतो ? अजूनही लोक खाजगी वाहनांच्या खरेदीकडे का वळतात ? अशा कोणत्याच प्रश्नाचे मुळ न शोधता बीआरटी वर नाराज कशाला ? असा प्रश्न उपस्थित करणे अतार्किक वाटत नाही काय ? .बीआरटी कल्पना म्हणून नक्कीच चांगली होती व आहे. पण गेली कित्येक वर्षात बीआरटीची मूळ कल्पना साकारण्यात ज्यांना यश आले नाही त्यांनी बीआरटीचा आग्रह कायम रेटत ठेवला आहे. त्यांना साथ देण्यापेक्षा या बीआरटी प्रकल्पावर झालेल्या आजवरच्या अब्जावधी च्या खर्चाची चौकशीची मागणी केली आणि यशस्वीपणे तिच्या मुळात शिरून पाहिले तर त्यांना बीआरटी पुण्यात अयशस्वी का झाली, आणि तेच बीआरटी चा विरोध कसा मोडून काढतात याचे उत्तर मिळाल्याशिवाय राहणार नाही. बीआरटी च्या एका स्थानकावर , दुभाजकावर किती खर्च होतो प्रत्यक्षात किती व्हायला हवा , बस खरेदी चे दर काय आहेत हे पाहिले तर यात पुणेकरांची लुट झाली कि नाही हे ते सांगू शकतील . म्हणजेच इथे पहिला प्रश्न असा निर्माण होतो कि तुम्हाला बीआरटी हवी कशाला ? वाह्तुक सुरळीत करायलाच हवी असेल तर प्रामाणिकता त्यासाठी अत्यंत गरजेची आहे,मग स्वतंत्र लेन जरूर घ्या , पण ती किमान 70 टक्के पुणेकरांना सोयीची ठरेल ,कामाची ठरेल, वापरता येईल अशी बीआरटी बनली तर कोण कशाला खाजगी वाहने वापरतील? पण तसे नाही .हे वास्तव आहे.
तेव्हा आता बीआरटी चे समर्थन जरूर करा पण त्या आधी या बीआरटीच्या नावाने झालेला आर्थिक गैरकारभार चव्हाट्यावर मांडा, आणि यापुढे तो होणार नाही , आणि नाही झाला तर तो बीआरटी च्या विकासावर खर्च होऊन बीआरटी सदृढ होईल ,७० टक्के लोकांच्या ती कामी येईल त्यांच्या नौकरी- व्यवसायाला ती आवश्यक बनेल अशी बनली तर खचितच कोणीही बीआरटी तळी उचलतील अन्यथा.. तळी उचलणाऱ्यांना प्रश्न विचारतील बीआरटीलेन हवी कशाला रे भाऊ ?