पुणे- आठच्या आठ आमदारांनी केलं तरी काय ? अशा प्रश्नांचा वारंवार होणारा भडीमार , तत्कालीन पदाधिकाऱ्यांच्या दुराग्रहांना व्यवस्थित सावरीत समन्वय राखण्याचे कौशल्य दाखविणे,आणि विरोधी पक्षांच्या तोफांचा चतुराईने यशस्वी सामना करण्याचे कसब दाखविलेल्या श्रीनाथ भिमाले यांना , त्यांच्या तोडीचा, या पदाचा कारभार योग्य पद्धतीने करेल असा अन्य कोणी नगरसेवक सभागृहात नसताना त्यांना म्हणजे भिमाले यांना सभागृहनेते पदावरून दूर करण्याचा विचार करणे म्हणजे ‘विनाशकाले विपरीत बुद्धी ‘ ठरणार आहे असा महापालिका वर्तुळातील राजकीय समीक्षकांचा दावा आहे. दोन आमदारांचे ठीक आहे पण सभागृहनेता बदलाच्या विचाराबाबत ‘कान कोणी फुंकले ‘ असा प्रश्न उपस्थित होतो आहे .
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला हडपसर आणि वडगावशेरी मतदारसंघांत दारूण पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्याची दखल घेवून राज्यात गुरुवारी काँगेस – राष्ट्रवादी – शिवसेना महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत असतानाच श्रीनाथ भिमाले यांना पुणे महापालिकेच्या सभागृहनेते पदाचा, तर सुनील कांबळे यांना स्थायी समिती अध्यक्षपदाचा आणि सिद्धार्थ शिरोळे यांना पीएमपीएलच्या संचालकपदाचा तडकाफडकी राजीनामा देण्याचे आदेश देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय नेते आणि कोथरूड चे आमदार चंद्रकांत दादा पाटील यांनी दिल्याचे वृत्त आहे .
स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे आणि पीएमपीएल चे संचालक सिद्धार्थ शिरोळे आता आमदार झाले आहेत. त्यामुळे त्यांचा राजीनामा चंद्रकांत दादा यांनी मागणे सहाजिक आहे . पण भिमाले यांचा राजीनामा मागणे म्हणजे अनेकांना अचंबित करणारे वृत्त वाटते आहे . भिमाले हे सभागृहातील ज्येष्ठ अनुभवी नेते आहेत . सर्व नगरसेवकांची त्यांनी व्यवस्थित मोट बांधली. ते पर्वती मतदार संघातून विधानसभेला इच्छुक होते . पण पक्षाने त्यांना उमेदवारी दिली नाही . मात्र याबाबत त्यांनी मनात कोणतेही किल्मिष न बाळगता भाजपच्या माधुरी मिसाळ यांचे काम केले .आणि त्यातही त्यांनी यश मिळविले .पराभूत झालेल्या दोन्ही जागांवर तेथील तत्कालीन विद्यमान असेलेले आमदार ,उमेदवार कारणीभूत आहेत हे ठाऊक असताना भिमाले यांचा राजीनामा मागणे म्हणजे पक्ष नेतृत्व स्थानिक राजकारणातील जुन्याच खेळींना बळी पडत असल्याचा दावा होतो आहे.