पिंपरी ते शिवाजीनगर मेट्रो या वर्षाअखेर सुरू करणार-गिरीश बापट
पुणे : “मेट्रो प्रकल्पाच्या पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महापलिका हद्दीतील कामांनी वेग घेतला आहे. या वर्षाअखेर आम्ही पिंपरी ते शिवाजीनगर मार्गावर मेट्रो सुरू करणार आहोत. त्याचे काम नोव्हेंबरमध्ये पूर्ण होईल.” अशी माहिती महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी येथे दिली.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ आज वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील खराडी आणि धानोरी भागात बापट यांची प्रचार फेरी काढण्यात आली होती. येथे ते बोलत होते. आमदार जगदीश मुळीक, माजी स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक, नगरसेवक संदीप जराड, बापूसाहेब कर्णे गुरुजी, संजय भोसले, अविनाश साळवे, अनिल टिंगरे, श्वेता गलांडे, राहुल भंडारे, मुक्ता जगताप, श्वेता चव्हाण, सुनीता गलांडे, हरझाना शेख, शीतल शिंदे, शीतल सावंत, किरण जठार, संतोष राजगुरू, संतोष भरणे, महेंद्र गलांडे, नवनाथ पठारे, सचिन सातपुते, स्वप्नील चव्हाण, राजाभाऊ चौधरी, शैलेश बनसोडे , संतोष खांदवे, रोहन शिंदे , रावसाहेब राखपसारे, सुनील खांदवे, सचिन धिवार आदी यावेळी उपस्थित होते.
बापट म्हणाले की, काँग्रेस सरकारने मेट्रो भुयारी असावी की जमिनीवरून या वादातच १५ वर्षे व्यर्थ घालविली. या वर्षात पुण्याची लोकसंख्या वाढल्याने वाहतूक व्यवस्थेवर ताण येऊ लागला. भाजप सरकारमुळे हा प्रश्न तातडीने मार्गी लागला. पुणे व पीएमआरडीए मेट्रो अंतर्गत जवळपास २० हजार कोटीची कामे सध्या कार्यान्वित झाली आहेत. या कामांमुळे जनतेमध्ये नवा आशावाद निर्माण झाला असून तीनही मार्गिकांच्या विस्तारीकरणाची मागणी देखील आता जोर धरू लागली आहे. परंतु, पहिल्या टप्प्यात सध्याच्या मंजूर झालेल्या मार्गिकेचे काम पूर्ण करून पुढील टप्प्यात आम्ही विस्तारीकरणाचा निर्णय घेणार आहे. या विस्तारीकरणाचा फायदा खराडी भागातील आयटीयन्सला होईल.
भाजप सरकारच्या कृतीशील, गतिमान आणि पारदर्शी निर्णय प्रक्रियेमुळे १५ वर्षे रखडलेला मेट्रो प्रकल्प आम्ही अवघ्या ५ वर्षात पूर्णत्वाच्या दिशेने नेऊ शकलो, असे सांगताना अभिमान वाटत आहे असल्याची भावना देखील बापट यांनी यावेळी व्यक्त केली.