शैक्षणिक क्षेत्रातील प्रश्न सोडविण्यासाठी मला लोकसभेत पाठवा -गिरीश बापट
पुणे-सामान्यातल्या सामान्य कुटुंबातील मुलांना उच्च शिक्षणाची कवाडे उघडतील ,शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांचे प्रश्न कसे सोडविता येतील यासाठी मला लोकसभेत पाठवा असे आवाहन आज येथे भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांनी केले .
भारतीय राजनीति अभ्यास मंडळ यांच्या तर्फे शुभारंभ लॉन्स येथे शैक्षणिक आव्हाने आणि आगामी धोरणे या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात सहभागी होऊन पुणे शहर लोकसभेचा उमेदवार म्हणून गिरीश बापट यांनी आपले मत या कार्यक्रमात व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीएमसीसी महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य प्रा. अनिरुद्ध देशपांडे होते.
बापट म्हणाले,’शिक्षणाचा अभाव असेल तर विविध समस्या निर्माण होतात. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थी शिक्षित कसा होईल यासाठी आमचा प्रयत्न आहे. शैक्षणिक क्षेत्रात आमची ध्येय धोरणे विद्यार्थी केंद्रित आहेत. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात महसुली खर्चाचा विचार करता सर्वाधिक खर्च हा शिक्षणावर खर्च केला जातो. सर्वात महत्वाचं म्हणजे हा सर्व पैसा कागदावरून प्रत्यक्षात खर्च केले जातात. शिक्षणातून संस्कार, रोजगार निर्माण होतात. त्यामुळे देशात कोणी मागास राहू नये हा आमचा प्रयत्न असतो. भटक्या विमुक्त जमाती, ऊसतोड मजूर, रिक्षा चालक यांच्या मुलांनी पारंपरिक व्यवसाय न करता उच्च शिक्षण घ्यावे यासाठी सर्वांना समान संधी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याचप्रमाणे शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना त्यांच्या कामात ढवळा ढवळ न करता त्यांना मदत करण्याचा माझा प्रयत्न असतो. त्यामुळे तुम्हा सर्वांचे प्रश्न सोडवण्यासाठी मला लोकसभेत जाण्याची संधी द्या असे आवाहन यावेळी बापट यांनी केले.
या कार्यक्रमाला अडव्होकेट एस.के जैन, गजानन एकबोटे, प्रा. अनिल कुलकर्णी यांच्यासह शिक्षण क्षेत्रात काम करणारे मान्यवर, प्राध्यापक, प्राचार्य उपस्थित होते.