विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांचा इशारा
रत्नागिरी, दि. ८ सप्टेंबर – कोकणवासीयांसाठी गणेशोत्सव अत्यंत महत्वाचा सण आहे. गणेशोत्सव २ दिवसावर आला असता कोविडच्या आरटीपीसीआर टेस्ट करण्याबाबत दोन नेत्यांच्या व्यक्तव्यावरून संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे गणपती आज अचानक आला आहे का? राज्य सरकारला नियोजन १०-१५ दिवसांपूर्वी करता आले नाही का ? कोकणवासीयांना सरकारने वाऱ्यावर सोडले असून, याची किंमत कोकणवासी वेळ आल्यावर नक्कीच चुकती करतील, असा इशारा आज विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिला.
आज प्रसारमाध्यमांशी बोलताना दरेकर म्हणाले, कोरोना संकटामुळे चाकरमानी गेले दोन वर्ष आपल्या गावी जाऊ शकला नाही. वर्षभर गणेशोत्सवाची वाट बघणारा चाकरमानी यंदाही संभ्रमात आहे. आपल्या गावी जाण्याआधी ७२ तासांची आरटीपीसीआर टेस्ट गरजेचे असल्याचे सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. तर दुसऱ्या बाजूला आमदार भास्कर जाधव यांनी चाकरमान्यांसाठी कोविड टेस्टची सक्ती नको, त्यामुळे आरटीपीसीआरची गरज नसल्याचे सांगत आहेत. त्याबाबत त्यांनी स्थानिक प्रशासनाशी, जिल्हाधिकाऱ्यांशीही चर्चा केली असल्याचे सांगितले. त्यामुळे पुनः एकदा राज्य सरकार व स्थानिक प्रशासनामध्ये समन्वय नसल्याचे दिसून येत असल्याची टीका आज दरेकर यांनी केली.
दरेकर म्हणाले, तीनचाकी आघाडी सरकार किंबहुना राज्य सरकारामध्ये समन्वय नसल्याचे आपण पाहत आलो परंतु आता रत्नागिरीमध्येही प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमध्ये समन्वय नसल्याचे दिसून येत आहे. स्थानिक प्रतिनिधींशी, जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली असून यांचे जिल्हाधिकाऱ्यांशी बोलने झाले म्हणजे नेमके काय, निर्णय घेण्यासाठी आपल्याला कोणता अधिकार आहे ? असा सवाल दरेकर यांनी उपस्थित केला असून ते म्हणाले, भास्कर जाधव हे आमदार आहेत. सरकारचे कोणतंही पद नसताना आरटीपीसीआरची गरज नसल्याचे जाहीर करून मोकळे झाले. कोणताही अधिकार नसताना आपण हे कसे जाहीर केले? असा सवालही दरेकर यांनी उपस्थित केला.
`एका बाजूला आमदार भास्कर जाधव बोलतात चाकरमान्यांना आरटीपीसीआर सक्ती नको तर दुसऱ्या बाजूला गावागावात आरटीपीसीआर गरजेची असल्याचे पालकमंत्री उदय सामंत बोलत आहेत. सरकार म्हणून निर्णय होत असतात, परंतु भास्कर जाधव यांना आली लहर म्हणून त्यांनी एक वक्तव्य करायचे, पालकमंत्र्यांनी दुसरे वक्तव्य करायचे, कलेक्टर याबाबत काही बोलत नाहीत. ग्रामपंचायतीने गावात सांगायचे तुम्ही व्यवस्था उभी करा, नेमके चाकरमान्यांनी करायचे तरी काय असा सवाल उपस्थित करत दरेकर म्हणाले, चाकरमानी आता संतप्त झाले आहेत. २० – २५ तास कशेडी टोल नाका, पेण नाका असेल खारेपाटण असेल २० – २५ तास मुंबईकर रस्त्यात आरटीपीसीआर टेस्टसाठी थांबले होते. त्यामुळे गणपती आज अचानक आला आहे का ? तुम्हाला नियोजन १०-१५ दिवसांपूर्वी करता आले नाही का ? असा सवालही दरेकर यांनी उपस्थित केला.