पुणे- येथील कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाने ब्राम्हण समाजाचाच उमेदवार देण्याचे ठरविल्याचे वृत्त हाथी आले आहे. यामुळे शैलेश टिळक आणि धीरज घाटे हि दोन नावे आता आता आघाडीवर असल्याचे सांगण्यात येत आहे, या खेरीज मेधा कुलकर्णी या कसब्याच्या रिंगणात नाहीतच आणि स्वरदा बापट यांची संधी खासदार बापट यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव आणि खुद्द स्वरदा या देखील प्रसुतीच्या आराम काळात असल्याने दूर गेल्याचे मानले जाते आहे. दरम्यान राज्यातील नेतृत्वाच्या वरच्या फळीतील एका नेत्याने मात्र कसबा मतदार संघात आता ब्राम्हण मतदार किती उरला आहे याचा अभ्यास केला पाहिजे असे मत नोंदवीत ब्राम्हणेतर उमेदवार द्यावा अशी अप्रत्यक्ष मागणी नोंदविल्याचे हि समजते आहे.
भाजपकडून कसबा पोटनिवडणुकीसाठी शैलेश टिळक यांच्या नाव आघाडीवर आहे. शैलेश टिळक हे भाजप आमदार मुक्ता टिळक यांचे पती आहेत. शैलेश टिळक यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची मुंबईत भेट घेतली आहे.तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली आहे , त्यांनी ‘कळवितो ‘ असे त्यांना सांगितले आहे,तर धीरज घाटे यांनी देखील फडणवीस यांची भेट घेतली आहे आणि टिळकांना देणार नसाल तर आपला प्राधान्याने विचार करावा असे सांगितले आहे.कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी आपण कसबा मतदार संघात निवडणूक लढविण्यास इच्छुक नसल्याचे सांगत त्यामुळे या संदर्भात आपण कोणाला संपर्क केलेला नाही आणि कोणी आपल्याला संपर्क केलेला नाही असे म्हटले आहे. आपल्याला तेथील स्थानिक पदाधिकारी, इच्छुक यांच्या हक्कावर गदा आणण्याची अजिबात इछ्या नाही असेही त्यांनी म्हटल्याचे वृत्त समजते आहे. तर कन्यारत्न प्राप्त झाल्याने आता महिनाभर स्वरदा बापट माहेरी सांगलीतच असतील असेही समजते आहे.दरम्यान खासदार गिरीश बापट यांचा मतदार संघात मोठा प्रभाव आहे त्यांचा जसा घरोघरी प्रत्यक्ष संपर्क आहे तसा टिळकांचा नाही आणि सर्व स्तरातील नागरिकांना सहज उपलब्ध होऊ शकेल असा उमेदवार म्हणून घाटे यांच्या सारखी तुलना टिळकांची होऊ शकत नाही . केवळ या अशाच मुद्द्यांवर आणि घराणेशाही नको या विचारावरच टिळकांना नाकारले जाईल असेही कोणाला वाटत नाही.मात्र शेवटच्या क्षणी निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी खुद्द शरद पवारांशी जर खासदार बापट यांनी संपर्क साधला तरच बिनविरोध निवडणुकीचा मार्ग खुला होऊ शकणार आहे असेही मानले जाते. मात्र बापट यांच्या प्रकृती स्वस्थ्यामुळे हि शक्यता मावळली कि काय ? असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होतो आहे. महापालिकेतील माजी सभागृहनेते गणेश बिडकर, माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यापैकी ब्राम्हणेतर समाजातील इच्छुकांना हि येथून उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा आहे , एवढेच नव्हे तर रासने यांनी जोरदार तयारीही सुरु केल्याने आश्चर्य व्यक्त होते आहे. तीन वेळा स्थायी समिती अध्यक्षपद दिल्यानंतर रासने यांना उमेदवारी कशाला ? असा प्रश्न उपस्थित होत असला तरी त्यांची तयारी नजरेत भरणारीआहे .तरीही भाजपचे राजकीय गणित धक्कातंत्रावर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही .याच आधारावर काल रात्री एका ज्येष्ठ पत्रकाराने कसब्यात माजी खासदार संजय काकडे यांना उमेदवारी दिली जाईल अशी टूम सोडल्याने बरीच खसखस पिकली .भाजप उद्या किंवा परवा अधिकृत उमेदवार घोषणा करण्याची शक्यता आहे.उमेदवारी जाहीर करण्यापूर्वी फडणवीस किंवा चंद्रकांत दादा पाटील या दोहोपैकी एक जण खा. बापट यांच्याशी फोनवर संपर्क साधून उमेदवारी घोषित करतील असेही सांगितले जाते आहे.